केवळ रणगाडे आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तान वाचणार नाही
- देशाच्या खराब आर्थिक स्थितीबाबत अंतर्गत व्यवहार मंत्र्यांचे प्रतिपादन
- मनमोहनसिंग यांच्या प्रमाणे पाकिस्तानातही उपाययोजना व्हावी
इस्लामाबाद – राजकीय अस्थैर्यामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची नाजुक बनली आहे त्याकडे आता आपल्याला गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. केवळ रणगाडे आणि क्षेपणास्त्रांमुळे पाकिस्तानू वाचू शकणार नाही असा गंभीर इशारा पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री अहसान इक्बाल यांनी दिला आहे.
इक्बाल यांच्याकडे देशाच्या नियोजन आणि विकासाचेही खाते आहे. त्यांनी म्हटले आहे की, सन 1990 च्या दशकात भारतात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी आर्थिक सुधारणांचे धोरण स्वीकारले आणि देशाला मजबूत आर्थिक स्थितीत नेले. तशाच प्रकारच्या उपायांची पाकिस्तानला गरज आहे.
पाकिस्तानचे अर्थमंत्री सरताज अजिझ यांच्याकडून मनमोहनसिंग यांनी आर्थिक सुधारणांची प्रेरणा घेतली होती असा दावा त्यांनी केला. या सुधारणा मनमोहनसिंग यांनी भारतात यशस्वीपणे राबवल्या पण पाकिस्तानला मात्र त्याबाबतीत अपयश आल्याचे त्यांनी नमूद केले. हेच धोरण बांगलादेशानेही यशस्वीपणे राबवले. पण राजकीय अस्थैर्यामुळे पाकिस्तानने तब्बल एक दशक वाया घालवले.
आपल्याला आर्थिक उदारीकरणाची धोरणे त्यामुळे यशस्वीपणे राबवता आली नाहीत. त्याचा मोठा फटका देशाला बसला आहे असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या सायबर सिक्युरिटी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. जगातले अनेक देश जे आपल्या मागे होते ते आज आपल्या कितीतरी पुढे निघून गेले आहेत. तसे का झाले याचा विचार करण्याची वेळ आली आहे असेही इक्बाल यांनी म्हटले आहे.
आपल्याला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. नुसते आपल्याकडे रणगाडे आणि क्षेपणास्त्रे असून उपयोग नाही. त्यातून देश वाचणार नाहीं असेही त्यांनी स्पष्ट केले.