शरीरसुखाची मागणी केल्याची घटना क्लेषदायक – अशोक चव्हाण
- अशोक चव्हाण : सरकारची धोरणे आणि शेतक-यांप्रती अनास्थाच कारणीभूत
- फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा
मुंबई – बुलढाण्यात पीककर्ज देण्यासाठी शेतक-याच्या पत्नीकडे बॅंक अधिका-याने शरीरसुखाची मागणी केल्याची घटना अत्यंत क्लेषदायक आणि महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे. याला सर्वस्वी सरकारची धोरणे आणि शेतक-यांप्रती अनास्था कारणीभूत आहे.
शेतकरी आता अगतिक झाल्यानेच अशा त-हेचे शोषण यंत्रणांमार्फत केले जात आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
शेतक-याला सावकाराच्या दारात जावे लागू नये यासाठी वर्षानुवर्ष बॅंकां मार्फत शेतक-यांना पीककर्जाचा पुरावठा केला जातो. या सरकारच्या कालवधीत गेल्यावर्षी खरीप हंगामात उद्दिष्टाच्या केवळ 30 टक्के आणि रब्बी हंगामात फक्त 17 टक्के कर्जवाटप झाले होते. यावर्षीही 31 मे पर्यंत उद्दिष्टाच्या केवळ 11 टक्के पीक कर्जवाटप झाले आहे. विदर्भ,मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात10 टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप झाले आहे. शेतकरी बॅंकांच्या दारात याचकाप्रमाणे उभे आहेत.
भाजप सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुरक्षित नाहीतच पण आता शेतक-यांच्या कुटुंबातील महिलाही सुरक्षित नाहीत. यापूर्वी बीड जिल्ह्यातील एका खासगी सावकाराने शेतक-याची जमीन परत करण्यासाठी त्याची मुलगी आणि सुनेला आणून देण्याची मागणी केली होती. या घटना पाहिल्यावर राज्यातील शेतक-यांना सरकारने किती असहाय आणि हतबल केले आहे हे दिसून येते असे अशोक चव्हाण म्हणाले.
या प्रकरणी दोषी बॅंक अधिका-यांवर फक्त गुन्हा दाखल करून चालणार नाही तर त्यांना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली आहे.