विद्यापीठात विद्यार्थी दरबार भरवा
- अधिसभा सदस्यांची मागणी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी, प्राध्यापक व पालकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी विद्यार्थी दरबार भरवा अशी मागणी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी केली आहे. याबाबचे पत्रही सदस्यांनी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर यांना पाठविले आहे.
याबाबत संतोष ढोरे, दादाभाऊ शिनलकर, शशिकांत तिकोटे, अभिषेक बोके आदींनी याबाबत मागणीचे पत्र पाठविले आहे. या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे भारतातील नामवंत विद्यापीठ आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यामध्ये, त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यामध्ये प्रशासन कमी पडत आहे. शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रमुखांना भेटण्यासाठी काही तास हे नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले असतात. तर काही विभागांमध्ये जनता दरबार, लोकशाही दिन यांसारखे उपक्रम राबविण्यात येतात. याच धर्तीवर आपल्या सोयीनुसार विद्यार्थी व प्राध्यापकांना दिवसातील काही वेळ हा राखीव ठेवावा. तसेच महिन्यातील एक दिवस विद्यार्थी दरबार भरवावा अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे एक नवीन पायंडा पडून याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.