breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे श्रध्दांजली
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना शहरातील मान्यवरांनी वाहिली आदरांजली
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीं यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी महापाैर राहूल जाधव, सत्तारुढ नेते एकनाथ पवार यांनी आदरांजली वाहली. यावेळी उपमहापाैर सचिन चिंचवडे, नगरसेवक विलास मडेगिरी, बाबा त्रिभूवन, अतिरिक्त आयुक्त डाॅ. प्रवीण आष्टीकर, दिलीप गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महापालिकेनेही देखील पुढील पंधरा दिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. याशिवाय सात दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना शहरातील विविध मान्यवरांनी प्रतिक्रिया देवून आदरांजली वाहली.
महामार्ग जोडल्याने देशाची आर्थिक स्थिती भक्कम : महापौर राहुल जाधव
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे केवळ भाजपचे नाही तर, संपूर्ण देशाची मोठी हानी झाली आहे. वाजपेयींनी देशात प्रमुख महामार्ग बनवून ती जोडण्याची योजना राबविल्याने वाहतुक सुरळीत होऊन अनेक मोठी शहर एकमेकांना जोडली गेली आहेत. परिणामी बाजारपेठा जोडल्या जाऊन, देशातील आर्थिक स्थिती बळकट होत गेली. पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या वतीने मी त्यांना आदरांजली अर्पण करीत आहे, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.
………………..
वाजपेयींमुळे आज भाजप या स्थितीत : सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार
अटलबिहारी वाजपेयी हे दैवदुर्लभ नेतृत्व होते. त्याच्या पंतप्रधान काळातील कामांमुळे आज भाजप या स्थितीत आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ते भाजपचे उमेदवार विराज काकडे यांच्या प्रचारसभेला भोसरीत आले होते. त्यांच्या सभेला तब्बल 1 लाख लोकांनी गर्दी केली होती. त्या वेळी पक्ष कार्यकर्ते म्हणून प्रचाराची जबाबदारी आमच्यावर होती. सभेत त्याची भेट झाली होती, त्यांच्या निधनामुळे भारताची मोठी हानी झाली असून, भारताच्या संसदीय लोकशाहीच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहिल आणि अटलजी आमच्या हृदयात सदैव राहतील.
———————
माजी पंतप्रधान वाजपेयीं याचे वक्तृत्व, मनमोहक हास्य लोकांना आपलं करुन जायचे : आमदार लक्ष्मण जगताप
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीं याचे वक्तृत्व, मनमोहक हास्य लोकांना आपलं करुन जायचे, त्यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात हिंदीत भाषण केले होते. हिंदीत भाषण करणारे ते भारताचे पहिले विदेश मंत्री होते. तसेच भारत व पाकिस्तान यांच्यातील मतभेद दूर करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली होती. वाजपेयींच्या भाषणातील ”रग रग से हिंदू हूँ ”म्हणणारा हिंदुत्ववादाचा हुंकार असो, किंवा सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक देणारा राजधर्म पाळण्याचा सर्वधर्मसमभावाचा विचार असो अटल बिहारी वाजपेयी जीवनाच्या प्रत्येक सतरावर अग्रणी राहिले.
——————————
कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी असा नेता ; आमदार महेश लांडगे
भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी विविध अंगी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी असे मोठं नेतृत्व देशाने गमावले आहे. देशहित हेच त्यांचे पहिले प्राधान्य होते. पंतप्रधान म्हणून त्यांनी देशासाठी भरीव योगदान दिलं. १९९१ मध्ये भारताने उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि वाजपेयींच्या काळात त्याला गती देण्यात आली. पंतप्रधान म्हणून त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. वाजपेयींच्या निधनानं देशात प्रत्येक नागरिक हळहळ व्यक्त करत असून त्यांच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करतो.