इडन गार्डन्सवर खेळण्याचा फायदा झाला – कुलदीप यादव
कोलकाता- भारत विरुद्ध विंडीज सामन्यात 3 बळी मिळवून भारताच्या विजयात मोलाची कामगिरी करणाऱ्या सामनावीर कुलदीप यादवाने सामन्यानंतर बोलताना सांगितले की, या मैदानावर मी खूप सामने खेळलो आहे. या खेळपट्टीची संपुर्ण माहिती असल्याने कुठे टप्पा पडल्यावर चेंडू किती वळतो आणि किती उसळी घेतले याचा मला अचूक अंदाज होता. त्यामुळे या सामन्यात मी चांगली गोलंदाजी करताना यश मिळवताना संघाच्या विजयात हातभार लावला. असेही त्याने यावेळी नमूद केले.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे घरचे मैदान आहे या मैदानावर मी भरपुर क्रिकेट खेळलो आहे. त्याचा फायदा करुन घेताना मी वेस्ट इंडीजच्या संघाला चांगलेच अडचणीत आणले. मात्र, तुम्हाला खेळपट्टीची संपुर्न माहिती असणे हे तुमच्या दृष्टीने खुप फायद्याचे असते. आणि आम्हाला त्याचाच या सामन्यात जास्त फायदा झाला असेही कुलदीपने यावेळी सांगितले. सामन्यात 8 व्या षटकाच्या वेळी चेंडू वळायचा बंद झाला होता. मात्र, त्यावेळी मी चेंडूचा वेग वाढवताना चेंडूला उसळी दिली त्यामुळे त्याचा त्यावेळी जास्त फायदा झाला असेही त्याने सांगितले.
तसेच या सामन्यातुन पदार्पण करणाऱ्या कृणाल पांड्याला काय सल्ला दिला? असे विचारले असता तो म्हणाला, आम्ही पाठोपाठच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली. आमच्यात जेंव्हा संवाद झाला त्यावेळी त्याने मला सांगितले की, चेंडू वळत नाही परंतु तो हातात व्यवस्थीत बसत आहे. धुक्यांचा त्याच्यावर परिणाम जाणवत नव्हता त्यामुळे गोलंदाजी करणे अवघड झाले नव्हते असेही त्याने यावेळी सांगितले.
कुलदीप आणि कृणाल पांड्या यांनी वेस्ट इंडीज संघाचे कंबरडे मोडून टाकले होते. त्यानी सामन्यात एकवेळ वेस्ट इंडीजची अवस्था 15 षटकात 63 धावत 7 बाद अशी केली होती.
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या कामगिरी विषयी बोलताना कुलदीप म्हणाला, कमी धावसंख्येचा पाठलाग करणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यात ईडन गार्डन्सचे मैदान हे दुसऱ्या डावात जलदगती गोलंदाजांना मदत करते. त्यामुळे काही काळ आम्हाला सामना गमाऊ शकतो असे वाटत होते. परंतु, शेवटी आम्ही आरामात सामना जिंकला. यावेळी त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे सामन्यात काही काळ रंगत निर्माण झाली होती असेही त्याने यावेळी सांगितले. तसेच त्याने दिनेश कार्तिक आणि सामन्यातून पदार्पण करणाऱ्या कृनाल पांड्याचे कौतुक करताना सांगितले की, दिनेशने संयमी खेळी करत संघाचा विजय साकार केला तसेच कृनालने चांगल्या गोलंदाजीनंतर आपल्या अष्टपैलू द्फलंदाजीचे उत्तम उदाहरण सादर करताना संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात 3 बळी मिळवतानाच कुलदीपने आपल्या टी-20 क्रिकेट करिअर मधिल 100 बळींचा टप्पा या सामन्याद्वारे पूर्ण केला आहे.