Sansad Ratna Award | संसदरत्न पुरस्कार काय असतो? त्याचं महत्त्व किती?
Sansad Ratna Award | श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे, सुकांत मुजुमदार, सुधीर गुप्ता, कुलदीप राय शर्मा या पाच खासदारांना यंदाचा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच संसद उत्कृष्ट महारत्न पुरस्कार सुप्रिया सुळेंना प्रदान करण्यात आला. पण हे पुरस्कार नेमके काय आहेत? ते किती महत्वाचे आहेत? तसेच या पुरस्कारांचे निकष काय? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर याची उत्तर जाणून घेऊयात..
पुरस्काराची सुरुवात कधी आणि कोणी केली?
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून सन २०१० पासून संसदरत्न आणि संसद महारत्न पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत. चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात.
पुरस्कार किती महत्वाचा?
संसदरत्न पुरस्कार हे खासदारांना दिले जात असले तरी हे पुरस्कार सरकारतर्फे दिले जात नाहीत. तर चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई मॅगझीन यांच्यावतीनं हे पुरस्कार दिले जातात. पण या पुरस्कारार्थी निवड समितीत संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष असतात. तर सदस्यपदी इतर सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळं या पुरस्काराला एखाद्या सरकारी पुरस्काराप्रमाणेच महत्व आहे. त्यामुळं खासदारांना आपली कामगिरी सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
हेही वाचा – रामदास कदमांना भांडी घासण्याची कसली हौस? ठाकरे गटातील नेत्याचा टोला
पुरस्कार कधी दिले जातात?
संसदरत्न – वर्षभरात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदाराला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
संसद महारत्न – हा पुरस्कार दर पाच वर्षांनी दिला जातो. सातत्यानं आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सदस्यांना तो दिला जातो.
पुरस्काराचे निकष काय?
संसदेच्या कामकाजात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना हे पुरस्कार दिले जातात. वर्षभराच्या काळात तिन्ही अधिवेशनांमधील खासदारांची कामगिरी कशी आहे यावरुन त्यांची निवड केली जाते. खासदारांच्या मुल्यांकनासाठी एक समिती नेमली जाते.