शाळेत जायचंय पण नदीवर पूल नाही, विद्यार्थ्यांचा पालकांच्या खांद्यावर बसून जीवघेणा प्रवास
![Want to go to school but there is no bridge over the river, students ride on their parents' shoulders, a life-threatening journey](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Want-to-go-to-school-but-there-is-no-bridge-over-the-river-students-ride-on-their-parents-shoulders-a-life-threatening-journey.png)
अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या वडाळी देशमुख हे गाव राजकीय दृष्ट्या बहुचर्चित आहे. विकासाच्या दृष्टीने मात्र जैसे तेचं राहिले! या गावात कुठली सुधारणा झाली नाहीये. गावातीलच भाग असलेल्या छत्रपती शिवाजीनगर हे बोर्डी नदीच्या तीरावर वसलेले आहे. मात्र, तरीही संपूर्ण मजूर वर्गाचा आणि मुख्य गावाचा संपर्क तुटलेला आहे.
दरम्यान, गावकऱ्यांसह पालकांच्या खांद्यावर बसून येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नदी पार करावी लागत आहे. छत्रपती शिवाजीनगर ते मुख्य गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर बोर्डी नदीवर अजून इथे गेल्या कित्येक वर्षापासून पुल बांधला नाहीये. त्यामुळे सातत्याने थोडासा पाऊस जरी झाला तरी नदीला पूर येतो आणि येथील नागरिकांचा मुख्य गावाशी संपर्क तुटतो. दरम्यान, या नदीवर पणज इथे धरण बांधल्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी राहतो. तरीही या छत्रपती शिवाजीनगर आणि मुख्य गाव वडाळी देशमुखशी संपर्क बंद होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नदीपार करुन देताना पालकांना जीवघेणी कसरत करावी लागते.
१०० ते १५० लोकांची आहे वस्ती?
कित्येक वर्षापासून छत्रपती शिवाजीनगर या वस्तीमधील नागरिकांची कुठल्याच प्रकारची सोय सुविधा उपलब्ध झाली नाही. त्यांना दैनंदिन जीवनासाठी लागणारे दळण किराणा वगैरे साहित्य हे कुठून आणावे हा फार मोठा पेच निर्माण झाला आहे. तरीही एवढ्या या नदीच्या पूरामधून नागरिक दळण किराणाला मुख्य गावात जीव धोक्यात टाकून येत आहेत. या विषयांवर आजपर्यंत कुठल्याच स्थानिक लोकप्रतिनिधिंनी निधी व छोटे खाणी पूल या ठिकाणी उभारले नाही. त्यामुळे गावकऱ्यांसह विद्यार्थ्यांचे देखील शालेय नुकसान होत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी या बोर्डी नदीवर छोटा पूल बांधण्यात यावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी नगरातील नागरिकांची आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ये-जा करण्यासाठी पूलाअभावी जनजीवन विस्कळीत झाले असून चिमुकल्या विद्यार्थ्यांना या नदीच्या पाण्यातून जीवघेणा शालेय प्रवास करावा लागतोय. या दरम्यान, कुठलीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण राहील? असा सवाल छत्रपती शिवाजी नगरातील नागरिक प्रकाश काळे यांनी उपस्थित केला आहे. आतापर्यत सर्व नागरिकांना कुठल्याच प्रकारची शासनाची सोय-सुविधा, ना कुठल्याच लोकप्रतिनिधी आमच्याकडे फिरकला नाहीये. मात्र, मतदानाच्या प्रसंगी आम्हाला बोर्डी नदीवर पुल उभरण्यासाठी पूल निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन देतात. असेही राजकुमार खोबरखेडे या गावकऱ्याचे म्हणणे आहे.