उद्धव ठाकरे आता शेवटचा ‘एक्का’ वापरणार? तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहचला असतानाच आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून आणखी एक खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) हे आता राजकारणात सक्रिय होऊ शकतात. तेजस ठाकरे यांच्याभोवती ‘ब्रँड ठाकरे’चे वलय असल्याने शिवसैनिकांमध्ये त्यांच्याविषयी उपजतच आकर्षण आहे. त्यामुळे आता शिवसेना संकटात असताना तेजस ठाकरे सक्रिय होणे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकते.यापूर्वी अनेकदा तेजस ठाकरे राजकारणात येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नव्हते. काही मोजक्या राजकीय घटना वगळता तेजस ठाकरे हे राजकारणापासून दूर राहिल्याचे दिसून आले होते. परंतु, आता शिवसेनेचे (Shivsena) बहुतांश मातब्बर नेते पक्ष सोडून गेल्यामुळे तेजस ठाकरे मैदानात उतरून पक्षाला नवी उभारी देण्यासाठी प्रयत्न करू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
तेजस ठाकरे राजकारणात सक्रीय नसले तरी त्याने शिवसेना पक्ष संघटना व ठाकरे परिवारासाठी कार्ला गडावर येऊन देवीचे दर्शन व आशीर्वाद घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात शिवसेना संपते की काय, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. मात्र, या घटनेनंतर आदित्य ठाकरे राजकारणात आणखी सक्रिय होत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र, तेजस ठाकरे यांनी एकवीरा आईचे दर्शन घेतल्याने शिवसेनेवर आलेली संकटे दूर होतील का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तेजस ठाकरे यांनी मागितलेली मनोकामना पूर्ण होणार का? शिवसेना पुन्हा उभारी घेणार का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.