Tweet by Sanjay Raut: ‘नेमकं हेच घडलं’; संजय राऊतांनी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचं कारण
![Tweet by Sanjay Raut: 'Exactly what happened'; Sanjay Raut explained the reason for Uddhav Thackeray's resignation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Tweet-by-Sanjay-Raut.jpg)
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आणि भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. तसंच बंडखोर शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘राज्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळावा, म्हणून आम्ही प्रयत्न केले होते. मात्र आता तुमचा नेता मुख्यमंत्री होणार आहे का? तुम्हाला स्वाभिमान सोडून आता कोणाची तरी धुणी-भांडी करावी लागणार आहेत,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
‘जे लोक आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मला दोष देत आहेत त्यांनी महाविकास आघाडीत मंत्रिपद घेतले होते. या सगळ्यांना उत्तम खाती मिळाली होती आणि हा प्रयोग महाराष्ट्रात पुढील २५ वर्ष चालायला हवा, अशी वक्तव्य या नेत्यांकडून केली जात होती. मात्र आता पाठीत खंजीर खुपसण्यासाठी कारणे शोधली जात आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊतांनी ट्वीट केला फोटो
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वी एक फोटोही ट्वीट केला आहे (Sanjay Raut Tweet). या फोटोतून उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच लोकांनी धोका दिला असल्याचं राऊत यांनी सुचवलं आहे. उद्धव यांच्या पाठीवर वार झालेला फोटो शेअर करत ‘नेमकं हेच घडलं’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांनंतर आता बंडखोर शिवसेना आमदारांच्या गटाकडूनही प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे.