लातूर शहरात मंगळवारी रात्री थरारक घटना
लातूर : लातूर शहरात मंगळवारी रात्री थरारक घटना घडली आहे. शहरातील औसा रोडवरील कालिका देवी मंदिर परिसरात काही तरुणांनी हातात शस्त्र घेत गाड्यांची तोडफोड करत जो आडवा येईल त्याला जखमी करून परिसरात मोठी दहशत माजवली. या प्रकारानंतर परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.
शहरातील जुना औसा रोडवरील कलिकादेवी मंदिर परिसर, दादोजी कोंडदेव नगर, लक्ष्मी कॉलनी परिसरात रात्री ८ ते ९ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी हातात शस्त्र घेऊन गाड्यांची तोडफोड केली. तसंच किराणा दुकानांचीही तोडफोड करत नुकसान केले. या टोळक्याने एका चारचाकी वाहनाची तोडफोड करत चालकाकडून दोन हजार रुपये घेतले. एवढ्यावरच हे तरुण थांबले नाहीत तर त्यांनी दोन ते तीन जणांना मारहाणही केली. या हल्ल्यात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरुणांच्या उपद्रवाची माहिती मिळताच शिवाजी नगरचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि अगदी फिल्मी स्टाईलने आरोपी तरुणांचा पाठलाग करत दोघांना ताब्यात घेण्यात आले, तर तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. अजिंक्य नीलकंठ मुळे आणि संकेत तावरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत, तर ओम यादव आणि त्याचे दोन साथीदार फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दहशत माजवणाऱ्या आरोपींची लातूर शहरातून धिंड काढावी, अशी मागणी करत परिसरातील नागरिकांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत आंदोलन केलं. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि लातूर शहरचे पोलीस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे हे शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी संतप्त जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. तसंच आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि पळून गेलेल्या अरोपींनाही तत्काळ अटक करू असं, आश्वासन दिले.
दरम्यान, याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.