‘….तर त्यांचा मनसुख हिरेन होईल?’; अनिल परब ईडी चौकशी प्रकरणात किरीट सोमय्यांचा आरोप
रत्नागिरी : दापोली मुरूड येथील साई रिसॉर्ट परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आज एक ट्विट केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जमिनीचे मूळ मालक विभास साठे यांचा मनसुख हिरेन होऊ शकतो, असे ट्वीट त्यांनी केले आहे. याची माहिती त्यांनी थेट पत्राद्वारे राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिली आहे.
पोलीस महासंचालकाना लिहिलेल्या पत्रात सोमय्या यांनी परब यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. या घोटाळ्यासंबंधी अनेक तपास यंत्रणा व संस्थांनी तसेच राज्याचे पर्यावरण मंत्रालय व केंद्र सरकार यांनी अनिल परब व त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचाही निर्णय घेतला आहे. मंत्री अनिल परब यांनी मे २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फ्रॉड, फोर्जरी, चीटिंग करून तिथे रिसॉर्ट बांधला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी या पात्रातही केला आहे.
अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले आहेत. म्हणून आम्हाला भीती वाटते की, परब हे विभास साठेंवर दडपण आणणार. विभास साठे यांचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांची आहे, असेही सोमय्या यांनी या पत्रात म्हटले आहे.
विभास साठे यांच्या जिवाला धोका लक्षात घेत त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, त्यांचा मनसुख हिरेन होणार नाही हे पहावे अशी विनंती त्यांनी पत्रात केली आहे. हे पत्र त्यांनी पोलीस महासंचालकांना मंगळवारी ३०मे रोजी दिले आहे.
दरम्यान, रिसॉर्ट प्रकरणी मुरूड येथील तत्कालीन मंडळ अधिकाऱ्यांनाही ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना मुरूड येथील काही रिसॉर्ट चालकांना दापोली उपविभागीय अधिकाऱ्यांनी नोटीसा जारी केल्या आहेत. पण या नोटीसा जारी करण्याचे टायमिंग याचवेळी कसे काय साधले?, असा सवालही आता उपस्थित केला जात आहे.