नदीचे पाणी गावातील ‘एसबीआय’च्या शाखेत आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले ; तब्बल १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजली!
![The river water went to the SBI branch in the village and to the coffers of the co-operative credit institution; 12 lakh 22 thousand rupees cash soaked!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-river-water-went-to-the-SBI-branch-in-the-village-and-to-the-coffers-of-the-co-operative-credit-institution-12-lakh-22-thousand-rupees-cash-soaked.jpg)
हिंगोली : राज्याच्या विविध भागात मागील आठवडाभरापासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाचं थैमान सुरू असून ९ जुलैपासून कुरुंदा व परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. परिणामी नदीचे पाणी गावातील ‘एसबीआय’च्या शाखेत आणि सहकारी पतसंस्थेच्या तिजोरीपर्यंत गेले होते. यामुळे जवळपास १२ लाख २२ हजार रुपयांची रोख रक्कम भिजल्याची माहिती बँक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे कुरुंदा गावात महापूर आला होता. यावेळी पुराचे पाणी एसबीआय, जगद्गुरु पतसंस्था आणि शिवेश्वर सहकारी बँकेच्या तिजोरीपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे भिजल्याची माहिती दिली. पुराच्या पाण्याने दोन्ही बँकेतील कागदपत्रे आणि संगणकाचंही नुकसान झालं आहे.केंद्रीय कन्या पाठशाला, जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, तसंच अंगणवाड्यांतही पुराचे पाणी घुसले होते. त्यामुळे गावातील सर्वच शाळा तीन दिवसापासून बंद आहेत. पाऊस थांबत नाही तोपर्यंत शाळा बंद राहतील, असं शिक्षण विभागाने सांगितलं आहे.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन झालेलं नाही. जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत तालुक्याला अतिवृष्टीचा दुसऱ्यांदा फटका बसला आहे. हजारो हेक्टरवरील पिकेही पाण्याखाली गेली आहेत. जवळपास १९ मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा सहन करावा लागला आहे.