ठाकरे सरकारची अग्निपरिक्षा; बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे तीन मंत्री व १ आमदार गैरहजर राहणार?
![Thackeray government's ordeal; Three NCP ministers and one MLA will be absent for majority test?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Thackeray-government.jpg)
मुंबईः शिवसेनेतील बंडानंतर राज्यात उद्भवलेल्या सत्तानाट्यात भारतीय जनता पक्षाने अखेर थेट उडी घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यपालांची भेट घेत तसं पत्र दिलं होतं. त्यानंतर राज्यातील चक्रे वेगाने फिरत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवलं आहे. सरकारला ३० जून रोजी बहूमत चाचणीला समोरे जावेल लागणार आहे. मात्र, या बहूमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे चार मंत्री गैरहजर राहणार असल्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. राजभवनाकडून मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ सचिवांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्यानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नेते बहूमत चाचणीसाठी गैरहजर असतील त्यामुळं बहूमत चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी आघाडी सरकारकडून करण्यात येऊ शकते.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्यक विकास मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मंत्री बहूमत चाचणीसाठी गैरहजर असण्याची शक्यता आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार आणि छगन भुजबळ यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळं ते क्वारंटाइन असल्याने उद्याच्या बहुमत चाचणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे. तर, नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार उद्याच्या या निर्णयाक प्रसंगी हजर राहणार का?, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे गट उद्या मुंबईत येणार
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अखेर इतर आमदारांसह उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती दिली आहे. ‘आम्ही सर्व आमदारांना घेऊन बहुमत चाचणीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत. आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील,’ असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे.