मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात, भरधाव ट्रकची १०-१२ गाड्यांना धडक
पुणे : भरधाव वेगात जाणाऱ्या माल वाहतुकीच्या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात घडला आहे. या अपघातात १० ते १२ चारचाकी वाहनांचे नुकसान झालं आहे. हा अपघात मंगळवारी सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील पुलाजवळ घडला. सुदैवाने ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातात काही वाहनांचं किरकोळ, तर काही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून अहमदाबादकडे कपडे घेऊन निघालेला ट्रक वडगाव बुद्रुक येथील पुलावरून खाली येत होता. यावेळी ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यात दहा ते बारा वाहनांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यात वडगाव बुद्रुक येथे ही घटना घडली.
दरम्यान सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनांची गर्दी होती. यात १० ते १२ चारचाकी वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचेही या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. अपघाताचे वृत्त समजताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग वाघमारे, वारजे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल पवार, पोलीस उपनिरीक्षक मुकेश कुरेवाड व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.