सेना लढाईतही हरली अन् तहातही हरलीच : आमदार राजू पाटील
डोंबिवली: राज्यसभा निवडणुकीचे सर्व अंदाज फोल ठरले असून अखेर भाजपने आपली खेळी यशस्वी करुन दाखवली आहे. भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांचा राज्यसभा निवडणुकीत विजय झाला आहे. काही अपक्षांसोबत मनसेचं एकमेव मत हे भाजपकडे गेल्याचे यावरून दिसून आले आहे. दरम्यान, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनसे आमदार यांनी ट्विटरवरून अभिनंदन केले आहे. तर, दुसरीकडे त्यांनी शिवसेनेला शाब्दीक फटका दिला आहे.
सेना लढाईतही हरली व तहात पण हरली, राजू पाटलांचं ट्विट
‘औरंग्याच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्यांसमोर त्यांच्या दोन मतांसाठी गुडघे टेकून काय मिळवले? सेनाप्रमुखांच्या विचारांना दफन करून कट्टर सैनिकाचा बळी पण दिला. सेना लढाईतही हरली व तहात पण हरली’, असं म्हणत राजू पाटलांनी शिवसेनेला फटकारलं आहे.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला धक्का
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, भाजपचे पीयूष गोयल आणि अनिल बोंडे हे विजयी झाले. हा महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे बोलले जाते. भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची खेळी यशस्वी ठरली आहे. तर काही अपक्षासोबत मनसेच एकमेव मत हे भाजप गेल्याचे यावरून दिसून आले आहे.