शिवसेनेच्या बंडखोर माजी मंत्र्यांना नव्या सरकारमध्ये मिळणार खास ‘गिफ्ट’!
कोल्हापूरः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेल्या शिवसेनेच्या सर्व माजी मंत्र्यांना बक्षीस म्हणून नव्या मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे गुलाबराव पाटील, दादा भुसे, बच्चू कडू, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासह किमान दहा माजी मंत्री हे पुन्हा मंत्री होण्याची दाट शक्यता आहे.
महाविकास आघाडीला सुरुंग लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा दिवसांपूर्वी बंडखोरी केली. त्यांच्या या बंडखोरीत १० मंत्री सहभागी झाले. हे सर्व मंत्री शिवसेनेचे तसेच शिवसेनेचे सहभाग सहयोगी सदस्य झालेले होते. याशिवाय प्रहारचे बच्चू कडू यांचाही त्यामध्ये समावेश होता. महाविकास आघाडी साकार होताना शिवसेनेला मुख्यमंत्रीपदासह नऊ कॅबिनेट व चार मंत्रिपदे मिळाली होती. त्यातील तीन मंत्रिपदे शिवसेनेने सहयोगी सदस्यांना दिली होती.
अडीच वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी आपलीच खरी शिवसेना आहे असे म्हणत बंडाचा झेंडा उभारला. या झेंड्याखाली आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री सहभागी झाले. त्यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे यांच्यासह अब्दुल सत्तार, बच्चू कडू, उदय सामंत, शंभूराज देसाई,संदीपन भुमरे व राजेंद्र यड्रावकर यांचा समावेश होता. माजी मंत्री संजय राठोडही या बंडात सहभागी झाले होते.
राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे गटाची आता नव्याने सत्ता आली आहे. शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. अतिशय महत्त्वाच्या काळात मंत्र्यांनी बंडखोरी करत शिंदे यांना ताकद दिली. त्यामुळे शिंदेंचे बंड यशस्वी झाले. यातूनच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. यामुळे या सर्वांचे बक्षीस म्हणून बंडात सहभागी झालेल्या सर्व माजी मंत्र्यांना पुन्हा आजी मंत्री करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. तो शब्द घेऊनच यातील बरेच जण शिंदे यांच्या गटात गेले होते. यामुळे येत्या आठवडाभरात या सर्वांचा शपथविधी होणार आहे.
शंभूराजांना बढती, यड्रावकर आबिटकर यांना संधी
एकनाथ शिंदे यांच्या बंडात पहिल्या टप्प्यापासून सहभागी झालेल्या शंभूराज देसाई यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपदाची बढती मिळू शकते. याशिवाय राजेंद्र पाटील, यड्रावकर यांच्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकाश आबिटकर आणि सांगली जिल्ह्यातील अनिल बाबर या बंडखोर आमदारांनाही मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते. हे दोघेही महाविकास आघाडी काळात मंत्रिपद न मिळाल्याने नाराज होते. त्यांची नाराजी आता दूर होण्याची शक्यता आहे.