छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘श्री बुधभूषणम्’ ग्रंथाचे पुनर्लेखन; १२४ किलो वजन अन् २०० वर्ष टिकणार
अमरावतीत हस्तलेखनाद्वारे केली निर्मिती
अमरावती: छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ‘श्री बुधभूषणम्’ या ऐतिहासिक ग्रंथाचे अमरावती येथे हस्तलेखनाद्वारे एका महाकाय ग्रंथात पुनर्लेखन केले आहे. अमरावतीच्या अजय साहेबराव लेंडे यांनी तब्बल चार वर्षांपासून मेहनत घेत या महाकाय ग्रंथाचे हस्तलिखित तयार केले. हा ग्रंथ तब्बल १२४ किलो वजनाचा आहे. एकूण १६४ पानांच्या या ग्रंथाची लांबी ५ फूट तर रुंदी ३ फूट इतकी आहे. या ग्रंथासाठी खास शिवकालीन पद्धतीच्या कागदाचा आणि विशेष शाईचा वापर केला आहे.
छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्य आणि ज्ञानाबद्दल तरुणाईमध्ये आकर्षण आहे. महाराजांनी वयाच्या १४व्या वर्षी ‘श्री बुधभूषणम्’ हा संस्कृत ग्रंथ लिहिला. सामाजिक चळवळीत काम करताना तरुणाईकडून बरेचदा या ग्रंथाबद्दल विचारणा होत असे. मात्र हा ग्रंथ सहजासहजी उपलब्ध होत नसल्याची अडचण लक्षात घेऊन अमरावती येथील अजय लेंडे यांनी या ग्रंथाचे पुनर्लेखन करण्याचे ठरविले. इतक्या मोठ्या स्वरूपात हा ग्रंथ तयार होण्याची ही भारतातील पहिलीच वेळ आहे, असे लेंडे सांगतात. या ग्रंथाची निर्मिती करण्यासाठी चार वर्षांचा कालावधी लागला असून किमान पुढील दोनशे वर्ष हा ग्रंथ सुस्थितीत राहील अशी अपेक्षा त्यांना आहे. या ग्रंथाच्या निर्मितीसाठी अजय लेंडे यांच्या पत्नी प्रा. सारिका लेंडे यांनीही मोलाचा वाटा दिला आहे.
छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीकडून नुकतेच अमरावती येथील ज्ञानेश्वर सभागृहात या ग्रंथाचे प्रकाशन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते झाले आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
– अजय लेंडे यांच्या संकल्पनेतून हा हस्तलिखित ग्रंथ साकारला आहे.
– ग्रंथाचे हस्तलेखन दर्यापूर तालुक्यातील सचिन पवार यांनी केले.
– विशेष शाई आणि ४८९ पेनचा वापर करण्यात आला.
– दिल्ली येथून शिवकाळातील कागद तयार करून ग्रंथ निर्माण केला.
– ग्रंथाची रुंदी ३ फूट, लांबी ५ फूट, जाडी ११ इंच आहे.
– ग्रंथाची एकूण पाने १६४ आणि वजन तब्बल १२४ किलो आहे.
– ७८ मीटर कॅनव्हास आणि १८ मीटर सोल्यूशन वापरून बाईंडिग केले.