महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी आता ‘रश्मी उद्धव ठाकरे’ मैदानात
मुंबईः शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Rebel) यांनी आपल्याच पक्षाविरोधात बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे बहुमत असल्याचा दावा करण्यात आल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार (MVA Government) अस्थिर झालं आहे. तर, राज्यात सत्ताबदलाचे संकेत देण्यात येत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Cm Uddhav Thackeray) खुर्ची वाचवण्यासाठी आता थेट रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) मैदानात उतरल्या आहेत.
आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेने स्थानिक पातळीवर शिवसैनिकांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी व माध्यमांशी सातत्याने चर्चा करत आहेत. तर, एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंही महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत खलबतं करत आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही आता मैदानात उतरल्या आहेत. सरकार वाचवण्यासाठी रश्मी ठाकरे यांनी सुत्रे आपल्या हातात घेतली आहेत.
बंडखोर आमदारांच्या पत्नींसोबत रश्मी ठाकरे सातत्याने संपर्कात आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेकडून वेगवेगळ्या प्रकारे बंडखोर आमदारांना मुंबईत परतण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. मात्र, त्याला अद्याप यश आलं नाहीये. त्यामुळं आता आमदार पत्नींच्या माध्यमातून रश्मी ठाकरे आमदारांना मुंबईत येण्याचं आवाहन करत आहेत. रश्मी ठाकरे या फोनवरुन बंडखोर आमदारांच्या पत्नींसोबत संवाद साधत आहेत. आमदारांना मुंबईत परत येण्यांसाठी आवाहन करत आहेत. तर, हे बंड थंड करण्यासाठी त्या प्रत्येकाशी फोनवरुन संवाद साधत आहेत.
उद्धव ठाकरेंनीही साधला संवाद
शिवसेना आमदारांनी पुकारलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांनी निरनिराळ्या माध्यमातून हे बंड शमवण्याचे प्रयत्न केले. मात्र, शिंदे गट अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहे. उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे.