रत्नागिरीत पावासाचे रौद्ररुप! जगबुडीने ओलांडली धोका पातळी, अर्जुना धरणाचा कालवा फुटला
![Rainy weather in Ratnagiri! Danger level crossed by submarine, Arjuna dam canal burst](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Rainy-weather-in-Ratnagiri-Danger-level-crossed-by-submarine-Arjuna-dam-canal-burst.jpg)
मुंबईः मुंबईसह कोकणात रविवार रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. कोकण विभागात शनिवारपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही सोमवारपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सतत कोसणाऱ्या पावसामुळं नद्यांनी रौद्ररुप धारण केलं असून जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हयात दक्षिण रत्नागिरी येथील लांजा, राजापूर येथे तर उत्तर रत्नागिरीतील दापोली, खेड, गुहागर येथे दिवसभर झालेल्या तूफान पावसामुळं पाणी साचले आहे. तर, काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही घडले आहेत. कोकणात मुसळधार पाऊस पाहता राज्य सरकारने त्वरित कठोर पावलं उचलली आहेत. तसंच, एनडीआरएफच्या तुकड्याही कोकणासाठी धाडण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडण्यास सुरुवात केली आहे. रात्री एक वाजता खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर, चिपळूण येथील वशिष्ठी नदी आणि राजापूर येथील कोदवली नदी इशारा पातळीवर आहेत. त्यामुळं नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, काल रात्री एकच्या दरम्यान जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्यानंतर खेड मटण मार्केटजवळ पाणी भरण्यास सुरुवात झाली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असून खेड, राजापूर, चिपळूण अलर्ट मोडवर आहेत.
अर्जुना प्रकल्प कालवा फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जावीतहानी झालेली नसली तरी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ४ जुलै रोजी सोमवार ३२६ मिलिमीटर इतका प्रचंड पाऊस झाला यावेळी हा उजवा कालवा फुटला याची माहिती सबंधित विभागाने जिल्हा प्रशासनाला मंगळवारी ५ जुलै रोजी दिली आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून वाहत उजव्या कालवा मध्ये शिरले आहे. सदर पाणी कालव्यातून वाहत होते. तथापि पाण्यासोबत वाहत आलेला पालापाचोळा कालव्याच्या १७ किलोमीटर च्या उर्ध्व बाजूस असलेल्या जाळी trash rackला अडकला गेला. त्यामुळे प्रवाहाला अडथळा होऊन कालव्यामधून वाहणारे पावसाचे पाणी अडवले गेले. त्यामुळे कालव्याला लागून अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या चेंबरच्या भिंतीवरून पावसाचे पाणी वाहून गेल्यामुळे कालव्याचे तसेच बाजूच्या शेतीचे अंशतः नुकसान झाले आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षातून व जिल्हा प्रशासनाकडुन देण्यात आली आहे.