कोकणात पावसाचे थैमान; गावखेड्यात नद्यांना पूर, सिंधुदुर्गमधील २७ गावाचा संपर्क तुटला
सिंधुदुर्ग: रविवार रात्रीपासून तळकोकणात पावसाने थैमान घातलं आहे. खेड, चिपळूणाला संततधार पावसाने झोडपले आहे. ५ ते ८ जुलै या कालावधीत पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली असून जिल्ह्यात पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
५ ते ८ जुलै या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांनी मुसळधार पावसाचा धोका लक्षात घेऊन दक्षता घ्यावी, असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी नदी ,कुडाळ येथील कर्ली नदी, खारेपाटण येथील वाघोटन नदी, कणकवली येथील गड नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे जिह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील निर्मला नदीला पूर आल्याने पाणी पुलावरून वाहत आहे. त्यामुळं वाहतूक ठप्प असून जवळपास २७ गावाचा संपर्क तुटला आहे. वेंगुर्ला सावंतवाडी राज्यमार्गावरील होडावडा तळवडा नदीलादेखील पूर आला असून पाणी पुलावरून वाहत असल्याने राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. कोकण रेल्वेवरील वैभववाडीजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्यानं वाहतूक काहीशी धीम्या गतीने सुरू आहे. खारेपाटण व तळवडा या ठिकाणी पुराचे पाणी बाजारपेठेत गेल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
दरम्यान, तळकोकणात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे.सावर्डे, कापसाळ रस्ता जलमय झाले आहेत. येथील महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले आहे. परिणामी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर खेड-चिपळूणपर्यंत चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे परशुराम घाट धोकादायक बनला आहे. येथे वाहतूक मध्येच थांबवण्यात येते.