आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरल्याने नाराज आमदारांसाठी गुडन्यूज
![Now that the second date of cabinet expansion has been fixed, good news for the disgruntled MLAs](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Now-that-the-second-date-of-cabinet-expansion-has-been-fixed-good-news-for-the-disgruntled-MLAs.jpg)
मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन ४० दिवस उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरल्याने नाराज आमदारांसाठी गुडन्यूज आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. मित्रपक्षातील आमदारांमध्येही सौम्य नाराजी आहे. विधिमंडळाचं अधिवेशन पार पडल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती आहे.
शिंदे फडणवीस सरकारचा जवळपास दीड महिन्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी (१४ ऑगस्ट) खातेवाटपही जाहीर झाले. यादरम्यान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तसेच खातेवाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासंबंधी तसेच नाराजीबद्दल आमदार बच्चू कडू यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरु राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येऊ शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी नाराज होणार नाही, असे ते म्हणाले.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये न्याय, अपंग कल्याण या खात्याचं मंत्रिपद तसेच अमरावतीचं पालकमंत्रिपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळालं नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे, ते शब्द पाळतील असं बच्चू कडू म्हणाले.
यावेळी आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. पक्षनिष्ठेवरुन आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला होता. त्याविषयी विचारले असता पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी लगावला.