सगळेच रिक्षाचालक बेईमान नसतात; शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदेंवर बोचरी टीका
बदलापूर: एखाद्या कंपनीत आपल्याला सुपरवायझर बनवलं, म्हणून कंपनीवरच दावा ठोकायचा नसतो, अशा शब्दात शिवसेनेचे (shiv sena) ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांना लक्ष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात पार पडलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या मेळाव्यात रुपेश म्हात्रे यांनी ही टीका केली.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर बदलापूर शहरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व नगरसेवक आणि बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला समर्थन दिलं होतं. त्यामुळं शिवसेनेचा सुपडा साफ झाल्याचं बोललं जातं असतानाच बदलापूर शहरात पुन्हा एकदा शिवसेनेच्या बांधणीला सुरुवात करण्यात आलीये. रविवारी बदलापूर शहरात निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा घेण्यात आला.
या मेळाव्याला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बदलापूर आणि अंबरनाथ ग्रामीणमधील शिवसेनेची पुनर्बांधणी करण्यात येणार असल्याची घोषणा संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे यांनी केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. आपण एखाद्या कंपनीत चांगलं काम केलं की मालक आपल्याला कामाप्रमाणे पगार देतो, आणखी चांगलं काम केलं की आपली पदोन्नती करतो, आपल्याला आणखी चांगल्या पदावर नेतो. आणखी चांगलं काम केलं तर सर्वांवर सुपरवायझर म्हणून लक्ष ठेवण्याचं काम देतो. पण याचा अर्थ असा नाही, की त्याला सुपरवायझर बनवलं, मॅनेजर बनवलं त्याने कंपनीवरच दावा ठोकावा, असं म्हणत रुपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
मी बारावीपासून ते लास्ट इयर कम्प्लिट करेपर्यंत संध्याकाळी पार्टटाईम रिक्षा चालवायचो, पण सगळेच रिक्षावाले बेईमान नसतात, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं.
या मेळाव्याला आनंद दिघे यांच्यासोबत काम केलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे, शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख माजी आमदार रुपेश म्हात्रे, कल्याण जिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्यासह शिवसेनेचे निष्ठावंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या मेळाव्यानंतर शहरातील शिंदे गटात गेलेले कार्यकर्ते पुन्हा सेनेत परत येतात का? हे पाहावं लागेल.