नीतिश कुमार आण तेजस्वी यादव यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
बिहारः बिहार विधानसभेत आज नीतिश कुमार आण तेजस्वी यादव यांच्या सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सत्ताधारी राजदचे (RJD) पाटणा येथील आरजेडीचे माजी आमदार सुबोध रॉय, आरजेडी नेते सुनील सिंग, अशफाक करीम आणि फैय्याज अहमद यांच्या घरांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. सुनील सिंह हे सहकारी संस्थेशी संबंधित आहेत तसेच ते RJD चे खजिनदार देखील आहेत.
सीबीआयच्या या मोठ्या कारवाईनंतर बिहारच्या राजकारणात मोठे वादळ आले आहे. नोकरी घोटाळ्यातील कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून ही छापेमारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईवर सुनील सिंह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आजचा दिवसच छापे मारण्यासाठी का निवडला गेला? मला जाणूनबुजून फसवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं चालतं आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. राजदचे राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्यासंबंधित ठिकाणांवरही सीबीआयने धाड टाकली आहे. सूत्रांनुसार, सीबीआयने आणखी काही पथके तैनात ठेवल्याची माहिती समोर येतेय.
झारखंडमध्ये ईडीचे छापे
बिहारशिवाय झारखंडमध्येही ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीने ज्या ठिकाणी छापे टाकले ते प्रेम प्रकाश नावाच्या व्यक्तीशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. प्रेम प्रकाश यांचे राजकारण्यांशी घट्ट नाते असल्याचे बोलले जाते. बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणी प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांची चौकशी केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी येथे अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
भरती घोटाळा काय आहे?
हे प्रकरण २००४-२००९ च्या रेल्वे भरती घोटाळ्याशी संबंधित आहे. लालू यादव रेल्वेमंत्री असताना नोकरीच्या बदल्यात जमीन देण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पैसे घेण्यात धोका असल्याने नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्यात आली. त्याचवेळी असे बेकायदेशीर काम करण्याची जबाबदारी लालूंचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांच्यावर देण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने जुलैमध्ये मोठी कारवाई करत लालूंचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांना अटक करण्यात आली होती.