Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा हायवेवर कुठे आहेत मृत्यूचे सापळे? रस्त्याची स्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच बिकट, बघा…
![Mumbai Goa Highway: Where are the death traps on Mumbai-Goa Highway? Instead of improving the condition of the road, it is getting worse day by day, see ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Mumbai-Goa-Highway.jpg)
मुंबई : ‘माझी आई आणि भाऊ या महामार्गाच्या दुरवस्थेने आम्ही आधीच गमावले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आत्तापर्यंत अनेक कुटुंबे काहीही चूक नसताना आपल्या जवळच्या माणसांना कायमची मुकली आहेत. पण रस्त्याची स्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. याचे सोयरसुतक ना प्रशासन आहे ना सरकारला. आपल्या हक्कासाठी आंदोलन केले तर तुमच्यावरच गुन्हे दाखल होतात, हे जास्त संतापजनक आहे…. कर्नाळाजवळील ग्रामस्थ किशोर भवुड यांची ही भावना महामार्गावरील प्रत्येक गावातून व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाल्यापासून म्हणजेच जानेवारी २०१० ते एप्रिल २०२१ दरम्यान घडलेल्या अपघातांत तब्बल २४४२ लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अॅड. ओवेस पेचकर यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेली माहिती मुंबई उच्च न्यायालयाच्या नजरेसही आणून दिली होती. न्यायालयानेही या गंभीर प्रकरणाची दखल घेत तत्काळ उपाययोजनांबाबतचे निर्देश दिले होते. पण त्यानंतरही आजपर्यंत कोणतेच चित्र बदललेले नाही. काही कामानिमित्त आपल्या गावी आलेल्या भाग्यश्री शिंदे यांना युसुफ मेहरअली सेंटरजवळ रस्त्याच्या वाईट स्थितीमुळे झालेल्या अपघातात प्राण गमवावे लागले. केवळ प्रशासकीय निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाने त्यांची कर्ती मुलगी गमावली यासाठी जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर भाग्यश्रीच्या कुटुंबाला आजही मिळालेले नाही. पळस्पेपासून इंदापूर पर्यंत अनेक गावांमध्ये अनेक कुटुंबांनी आपली जवळची माणसे चाळण झालेल्या महामार्गावर गमावली आहेत.
अपघातात मृत पावलेल्या मृतांच्या एकाही नातेवाईकाला साधी नुकसान भरपाई देण्याचे सौजन्यही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कधी दाखवले नाही. प्राधिकरणाच्या चुकांना जबाबदार धरून कारवाई करण्याऐवजी आम्ही आंदोलने करतोय म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात स्थानिक प्रशासनाने मात्र लगेच चपळाई दाखवली. अशापद्धतीने आम्हाला कितीही दाबवण्याचा प्रयत्न केला तरी सरकारला जाग येईपर्यंत आम्ही आमचा लढा सुरूच ठेवू, असा निर्धार पळस्पे इंदापूर प्रकल्पग्रस्त कृती समितीचे समन्वयक संतोष ठाकूर यांनी मटाशी बोलताना व्यक्त केला.
येथे आहे मृत्यूचा सापळा
मृत्यूचा सापळा बनलेल्या महामार्गाचा इतका धसका मुंबईत स्थायिक असलेल्या कोकणवासीयांनी घेतला आहे की ६० टक्के लोकांनी या मार्गावर रात्रीचा प्रवास करणेच सोडले असल्याची माहिती राज्य महामार्ग पोलिसांनी दिली. पदोपदी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागणाऱ्या या महामार्गावर एसटी असो वा खासगी बस अनेकांना आपले चालक आणि गाड्या टिकवण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागते. मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते पोलादपूर या पट्ट्यात कर्नाळा, बांधनवाडी, कल्हे, गिरवले, खारपाडा नाका, आमटेम, पेण शहर, वीर या ठिकाणी अपघातांची संख्या सर्वाधिक आहे. तर पोलादपूरच्या पुढे माणगाव, लोटे, कशेडी, लांजा, संगमेश्वर या पट्ट्यातही अनेक भागात छोटे मोठे अपघात होत असतात. अपघातांपैकी ७० टक्के अपघातांना नियोजन धाब्यावर बसवून सुरू असलेले काम हेच जबाबदार असल्याचा आरोप कोकण महामार्ग समन्वय समितीतर्फे करण्यात आला आहे.
गतिरोधकाचा धोका
या महामार्गावर ज्या भागात काम झाले आहे तेथे आणि जेथे काम सुरू आहे त्या भागात रस्त्याच्या दुतर्फा कोठेही रेडियम न लावल्याने रस्ता नेमका कोठे संपतो हेच लक्षात येत नाही. याचबरोबर गतिरोधकांवर पांढरे पट्टे न लावल्याने तेही लक्षात येत नाही आणि अनेक अपघात याच कारणांमुळे होत असल्याचा आरोप समन्वय समितीतर्फे करण्यात आला आहे. तसेच जेथे काम सुरू आहे तेथे मोठ्या प्रमाणावर मार्ग बदल आहेत त्याची पूर्वसुचना कोठेही मिळत नसल्याने अनेक भागांत अपघात होत असल्याचेही समितीने स्पष्ट केले आहे.