जालन्यातील आयकर छाप्याप्रकरणी ताजी अपडेट, आणखी ३० लॉकर्स तपासणार
जालना : जालना जिल्ह्यात मागील आठवडाभरात आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठं घबाड हाती लागलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. या कारवाईमध्ये तब्बल ५८ कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे फक्त राज्यातच नव्हे तर देशातही खळबळ उडाली आहे. कारण संपूर्ण देशात या छाप्याचीच चर्चा आहे. आता या छाप्यात आयकर विभागाला आणखी मोठं घबाड मिळण्याची शक्यता आहे. कारण स्टील कारखानदार आणि इतर व्यावसायिकांच्या मालमत्तांवरील छाप्यात अजूनही ३० लॉकर्सचा तपास सुरू आहे.
जालन्यात टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत एकूण ३० लॉकर्स तपाले गेले आहेत. तर अजूनही ३० लॉकर्सचा तपास सुरू आहे. या ३० लॉकर्सच्या पुढील तपासात आणखी मोठे घबाड हाती लागण्याची शक्यता आहे, असं बोललं जातंय. जालन्यातील बांधकाम सळ्यांचे उत्पादन करणाऱ्या दोन स्टील कंपन्या आणि पतपुरवठा करणाऱ्या दोन खासगी व्यावसायिकांच्या कार्यालयासह निवासस्थानी छापे टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम ऐवज आयकर विभागाने जप्त केला आहे.
जालन्यात तब्बल ३९० कोटींचं घबाड आयकरच्या हाती लागलं आहे. ही कारवाई आठ दिवस सुरू होती. यात ४०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होते. विशेष म्हणजे ‘राहुल वेड्स अंजली’ असे स्टिकर्स लावून आयकर विभागाचे कर्मचारी अनेक गाड्यांमध्ये जालन्यात दाखल झाले होते. या छाप्याची साधी कुणकुणही कुणाला लागली नाही.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाच्या वतीने अद्याप नेमकी किती रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहे, याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे माध्यमांतून येणाऱ्या आकडेवारीवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न व्यापारी संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.