भारताचा बांगलादेशवर थरारक विजय; 50 वर्षांनंतर मोठा पराक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/India-vs-bangladesh-1-1-780x470.jpg)
बांगलादेशविरुद्ध शेवटच्या क्षणापर्यंत चित्तथरारक झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अखेर टीम इंडियाने बाजी मारली. आर. अश्विन व श्रेयस अय्यर यांच्या भागीदारीमुळे भारताने विजय मिळवला. यामुळे भारताने मालिका २-० ने जिंकली आणि WTC टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
पहिल्या डावात बांगलादेशने 227 धावा केल्या, तर भारताने 314 धावांपर्यंत मजल मारताना 87 धावांची आघाडी घेतली. तर दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव 231 धावांवर आटोपल्याने भारताला कसोटी जिंकण्यासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज काही खास करू शकले नाहीत. विराट कोहली आणि के एल राहुल यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना निराश केले. अवघ्या 45 धावांत भारताच्या 4 विकेट गेल्या होत्या. चौथ्या दिवशी भारताची अवस्था 7 बाद 74 झाली होती. भारतीय संघाला पराभव स्पष्ट दिसत होता. मात्र अय्यर आणि अश्विनची जाेडी जमली दोघांनी छोट्या लक्ष्याचा पाठलाग करत भारताला विजय मिळवून दिला.
श्रेयस अय्यरच्या 29 आणि आर. अश्विनच्या 42 धावांच्या जबरदस्त भागीदारीमुळे टीम बांगलादेशच्या तोंडातील विजयाचा घास भारताने हिरावून घेतला. सोबतच अक्षर पटेलने देखील 34 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
गोलंदाजी व फलंदाजीमध्ये मोठे योगदान देणाऱ्या अश्विनला सामनावीर, तर मालिकेत सर्वाधिक धाव करणाऱ्या चेतेश्वर पुजाराला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताने बांगलादेशविरुद्ध सलग 5 वी मालिका जिंकली. इतकेच नव्हे तर या विजयासह टीम इंडियाने टेस्टमध्ये 50 वर्षांनंतर मोठा पराक्रम केला आहे.