राज्यात आणखी चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाकडून ऑरेंजसह यलो अलर्ट जारी
![Heavy rain will continue in the state for four more days, Meteorological department has issued orange and yellow alert](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/Heavy-rain-will-continue-in-the-state-for-four-more-days-Meteorological-department-has-issued-orange-and-yellow-alert.jpg)
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईकडून पुढील पाच दिवसांसाठी पावसाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झाल्यानं राज्यात पाऊस होत आहे. आज ज्या प्रमाणात पाऊस झाला त्यापेक्षा कमी पावसाची नोंद उद्या होण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट देखील जारी केले आहेत.
हवामान विभागाकडून अलर्ट जारी
भारतीय हवामान विभागानं पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेज अलर्ट दिला आहे. तर, ठाणे, पुणे आणि रत्नागिरीसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांना १७ सप्टेंबरला यलो अलर्ट देण्यात आला आहे. १८ ते २० सप्टेंबर या काळात प्रामुख्यानं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं या भागातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केले आहेत.
महाराष्ट्रातील नाशिक आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यासह बहुतांश जिल्ह्यात अधिक पाऊस झाला आहे. मात्र, खरीप हंगाम अंतिम टप्प्यात येत असताना झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कालपासून संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मीटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासोबताच, सापगाव पूल बुडणार नाही अश्या पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, अजून पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल. तरी सापगाव पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती येण्याची शक्यता पाहून, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपूरच्या सखल भागात पाणी शिरण्याची शक्यता
उद्या संध्याकाळी पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी सह सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात होईल असा प्रशासनाचा अंदाज आहे. उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यानं प्रशासन अलर्ट झालं आहे. बाधित नागरिकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यास उद्या सकाळी सुरुवात होणार आहे. पंढरपूर शहराच्या सखल भागात धरणांमधून १ लाख १० हजार क्यूसेक विसर्ग झाल्यावर पाणी शिरण्यास सुरुवात होते. उजनी धरणातून ९० हजार क्यूसेक आणि वीर धरणातून ४५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.