मुंबईकरांसाठी चांगली बातमी! रेल्वे, मेट्रो, बस, मोनोसाठी आता एकच मोबाइल ॲप
![Good news for Mumbaikars! Now a single mobile app for Railway, Metro, Bus, Mono](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Good-news-for-Mumbaikars-Now-a-single-mobile-app-for-Railway-Metro-Bus-Mono.jpg)
मुंबई: तिकीट काढण्यासाठी लांबलचक रांगेत उभे राहणे हे अत्यंत त्रासदायक असते. एखाद्या ठिकाणी तातडीने पोहोचायचे असल्यास रांगेमुळे विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी सर्व वाहतूक यंत्रणांचा तिकीट पर्याय उपलब्ध असलेले मोबाइल अॅप मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे.
सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना प्रवाशांना एकाच तिकिटांवर प्रवास करता यावा, यासाठी ‘एकात्मिक तिकिट प्रणाली’ वर आधारित ‘वन नेशन, वन कार्ड’ बनविण्यात येणार आहे. या कार्डमधील सर्व पर्यायांचा समावेश मोबाइल अॅपमध्येदेखील असेल. काही कारणास्तव कार्ड गहाळ झाले किंवा खराब झाले, तर अॅपच्या माध्यमाने डिजिटल तिकीट खरेदी करून प्रवास करता येणार आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून एकात्मिक तिकीट प्रणालीवर आधारित मोबाइल अॅप विकसित करण्यात येणार आहे. एकात्मिक तिकीट यंत्रणा सुरू असलेल्या देशातील सर्व ठिकाणी हे अॅप चालेल. येत्या दोन महिन्यांत या बाबतच्या निविदा मागविण्यात येणार आहेत. या निविदेमध्येच बँक निवडीचे निकष असतील. त्यामुळे या प्रणालीसाठी बँकदेखील निविदाप्रक्रियेअंती निश्चित करण्यात येणार आहे, असे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुभाषचंद्र गुप्ता यांनी सांगितले.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाची बेस्ट प्रशासनासह मध्य आणि पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा पूर्ण झाली आहे. राज्यात प्रवासी सेवा देणारे एसटी महामंडळदेखील या प्रणालीसाठी सकारात्मक आहेत. स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेसाठी सरकारी बँकांसह-खासगी बँकांनाही सहभागी करून घ्या, अशा सूचना केंद्र सरकारने केल्या होत्या. राज्यात सत्ताकेंद्र बदलल्यानंतर या सूचनांना केराची टोपली दाखवत निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. दरम्यान, करोनाकाळात सर्व प्रकल्पांसह या प्रकल्पालादेखील फटका बसला. अनलॉक काळात मेट्रो कारशेडवरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांविरोधात उभे राहिले. याचा परिणाम केंद्राच्या आणि युती सरकारमधील प्रकल्पांना बसला. आता पुन्हा सत्तातंर झाल्याने रेल्वे प्रकल्पांना गती मिळत आहे, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.