अवघ्या २३ व्या वर्षी मृत्यूला कवटाळले; तरुण शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
परभणी : आर्थिक विवंचनेतून एका २३ वर्षीय तरुण शेतकर्याने शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे. श्रीकांत अनिल चौधरी असे मृत शेतकऱ्याचं नाव आहे. श्रीकांत यांच्यावर बँकेचे १ लाख ४० हजार रुपये कर्ज होते. सततच्या नापिकीने हे कर्ज फेडावे कसे, असा प्रश्न श्रीकांत यांच्यासमोर निर्माण झाला होता. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील श्रीकांत अनिल चौधरी हे शेती व्यवसाय करत होते. मात्र चांगली मेहनत घेऊनही शेतीतून हवा तसा आर्थिक लाभ होत नव्हता. उलट सततची नापिकी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने ते मोठ्या आर्थिक संकटात होते. बोरी गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेचे श्रीकांत यांच्यावर १ लाख ४० हजार रुपये इतके कर्ज झाले होते. बँकेकडून घेतलेले हे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत श्रीकांत चौधरी यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.
प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यामध्ये देवाशीष चौधरी यांच्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाचे शवविच्छेदन बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, भावजई असा परिवार आहे. तरुण शेतकऱ्याने बँकेच्या कर्जामुळे टोकाचे उचलल्यामुळे बोरी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.