बदलत्या तिकीट दराचा रेल्वे प्रवाशांना फटका
पुणे | दुरंतो, राजधानी, शताब्दी आणि प्रिमियम प्रकारातील रेल्वे गाडय़ांसाठी मागणीनुसार बदलते तिकीट ठेवण्यात आले आहे. मात्र, विमानाप्रमाणे तिकिटाचे दर आधी कळत नसल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो आहे. तिकीट हातात पडल्यानंतरच दर कळत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडतो आहे. त्यामुळे रेल्वेने या गाडय़ांचा प्राथमिक दर जाहीर करण्याबरोबरच बदलत्या दराची कल्पना तिकीट खरेदीपूर्वीच प्रवाशांना द्यावी, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.
गाडय़ांना जशी मागणी वाढेल, त्या प्रमाणात तिकिटाचे दर वाढविण्यात येतात. दुरंतो, राजधानी आणि शताब्दी या प्रकारातील गाडय़ांसाठी ही पद्धत वापरली जाते. प्रिमीयम प्रकारातील गाडय़ांच्या तत्काळ तिकिटासाठीही तिचा वापर केला जातो. करोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक गाडय़ा बंद होत्या. सध्या दुरंतो, राजधानी आणि शताब्दी प्रकारातील बहुतांश गाडय़ा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे बदलते तिकीट दर पुन्हा लागू करण्यात आले आहेत. मात्र, या प्रकाराबाबत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. गाडीला मागणी नसतानाही वाढीव तिकीट दराची आकारणी केली जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
बदलत्या तिकीट दराच्या गाडय़ांसाठी ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढायचे झाल्यास कुठेही तिकिटाचे दर उपलब्ध केले जात नाहीत. तिकिटाचे बुकींग झाल्यानंतरच बँकेच्या खात्यातून तिकिटाचे पैसे वजा होतात. त्यानंतरच प्रवाशाला त्याने काढलेल्या तिकिटाचे दर समजतात. त्याचप्रमाणे तिकीट खिडकीवर दराबाबत विचारणा केली असता, ते सांगितले जात नाहीत. त्यामुळे प्रवाशाला दराबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसते. तिकिटाचे प्राथमिक दरही जाहीर केले जात नाहीत. खिडकीवर तिकीट हातात पडल्यानंतरच दर समजतात. या प्रकारामुळे प्रवाशांत गोंधळाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे रेल्वेनेही विमानाप्रमाणे तिकीट काढण्यापूर्वीच त्याचे दर जाहीर करावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी केली आहे.
बदलत्या तिकीट दराच्या गाडय़ांच्या तिकीट दरांची कोणतीही पूर्वकल्यपना प्रवाशाला दिली जात नाही. तिकीट हातात पडल्यानंतरच प्रवाशाला दर कळतात. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. आपण काढत असलेल्या तिकिटाचे दर प्रवाशाला तिकीट काढण्यापूर्वीच कळायला हवेत. अनेकदा गाडय़ांना मागणी नसतानाही रेल्वेकडून वाढीव दर घेतला जातो. त्यामुळे ही पद्धतच रद्द करून सरसकट तिकीट ठेवावे. त्यातून गाडय़ांनाही मागणी येऊन रेल्वेलाही उत्पन्न मिळेल.