जातीनिहाय जनगणना करा, सत्य काय ते समोर येऊ द्या, पवारांची केंद्राकडे मोठी मागणी
मुंबई: केंद्राने जातीनिहाय जनगणना करावी, सत्य काय ते सर्वांच्या समोर येऊ द्या, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्राला केली आहे. तसेच, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आज मुंबईत राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षण राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी ओबीसी आरक्षणावरून केंद्रावर सडकून टीका केली.
जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही – शरद पवार
“अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात की, यांची नेमकी लोकसंख्या किती? त्यासाठी काय करायचं? तेवढी लोकसंख्या आहे की नाही? अशी शंका उपस्थित करतात. मला आनंद आहे, की तुम्ही या परिषदेत एक याचिका मान्य केली. केंद्र सरकारने ओबीसीची जातीनिहाय जनगणना करावी. एकदा कळू द्या देशाला की नक्की काय शंका आहे. सत्य काय ते समोर येऊ द्या. पण, जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्रातील भाजप सरकारकडून होईल असे वाटत नाही”, असं शरद पवार म्हणाले.
आता या क्षणी जो आजार आहे त्यावर उपाय करण्याची गरज आहे – प्रवीण दरेकर
“जातीय जनगणनेसंदर्भात भाजपाचं कुठेही दुमत नाही. चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या देशपातळीवर त्या गोष्टी करण्याच्या दृष्टीने भाजपची भूमिका आहे. पण, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यासंदर्भात आपण काय करतोय, हे सांगावं. आता या क्षणी जो आजार आहे त्यावर उपाय करण्याची गरज आहे”, असं विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले.