बिल्डरांनी ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा. बांधकाम मूल्य कमी ठेवून गुणवत्तापूर्ण काम करायला हवे; नितीन गडकरींचा बिल्डरांना सल्ला
नागपूर: ‘मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याची क्षमता रिअल इस्टेट क्षेत्रात आहे. मात्र, बिल्डरांनी ग्राहकांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा. बांधकाम मूल्य कमी ठेवून गुणवत्तापूर्ण काम करायला हवे,’ असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दी टाइम्स ऑफ इंडिया-महाराष्ट्र टाइम्स आणि क्रेडाइ नागपूर मेट्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘टाइम्स प्रॉपर्टी रिअल इस्टेट अवार्ड’ प्रदान सोहळ्यात बिल्डरांना दिला.
रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात गडकरी बोलत होते. याप्रसंगी टाइम्स ग्रुपचे सहाय्यक उपाध्यक्ष तसेच रिअल इस्टेट नॅशनल हेड रसेल फर्नांडिस, टाइम्स ग्रुप्स नागपूरचे महाव्यवस्थापक हॅरॉल्ड पॉल, रोशन रिअल इस्टेटचे प्रमुख पंकज रोशन, व्हीकेए इन्फ्राचे वीरेंद्र खरे आणि प्रियंका खरे, आयकॉन स्टीलचे संस्थापक दिनेश राठी, क्रेडाइ नागपूर मेट्रोचे अध्यक्ष विजय दर्गन, वेद कौन्सिलचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, आर्किटेक्चर प्रशांत सातपुते, पाटणकर कन्सल्टंट प्रा. लिमिटेडचे चीफ स्ट्रक्चरल इंजिनीअर पी. एस. पाटणकर, ‘मटा’च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांची उपस्थिती होती. गडकरी म्हणाले,’गुणवत्तेशी तडजोड न करता स्वस्त घरे बांधण्याची गरज आहे. नागपूरसारख्या शहरात दहा लाख रुपयांहून अधिक किंमतीचे घर बांधल्यास ते विकत घेऊ शकणाऱ्यांची संख्या केवळ आठ ते दहा टक्के आहे. तेव्हा स्वस्त मात्र चांगल्या दर्जाची घरे तयार व्हायला हवीत. यासाठी पारंपरिक बांधकाम साहित्याऐवजी अपारंपरिक साहित्याचा उपयोग व्हायला हवा. त्यामुळे पारंपरिक साहित्य उत्पादित करणाऱ्या कंपन्याची मक्तेदारी संपुष्टात येऊन स्वस्त दरात बांधकाम साहित्य सामान्यांना उपलब्ध होऊ शकेल. अगदी टाकाऊ वस्तूपासून तयार होणारे साहित्य बांधकाम क्षेत्रात वापरण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. स्टीलऐवजी फायबरचा उपयोग वाढला आहे. कार्बन स्टील, ग्लास फायबर आदी नवे पर्याय आले आहेत. त्यांचा वापर करायला हवा.’ तत्पूर्वी, विविध वर्गवारीत बिल्डरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक रसेल फर्नांडिस यांनी केले. सूत्रसंचालन अभिषेक चौधरी यांनी केले. आभार हॅरॉल्ड पॉल यांनी मानले.
बँकांचे कर्ज घेऊ नका
कुठलाही प्रकल्प उभारताना बँकांचे कर्ज घेऊ नका. प्रकल्प सुरू करण्यासाठी स्वत:चे भागभांडवल पन्नास टक्के आणि बँकेचे कर्ज पन्नास टक्के अशा आदर्श समीकरणाचा अवलंब करा. माझ्या स्वत:च्या वैयक्तिक अनुभवावरून सांगतो अठरा टक्के, चोवीस टक्के व्याजदराने कर्ज घेऊन नुकसान करू नका. महानगरपालिका, पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आदींमुळे बरेचदा प्रकल्प लांबतो आणि त्याचा फटका कर्ज घेतलेल्या बिल्डराला बसतो, अशी भावना गडकरींनी व्यक्त केली.