भारत द्रविडी आणि आदिवासींचा, ओवेसींचा भाजपसह आरएसएसवर हल्लाबोल
मुंबई : एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भिवंडीत झालेल्या सभेत भाजप, (BJP) राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यावर टीका केली. असदुद्दीन ओवेसी यांनी भारताच्या इतिहासासंदर्भात भाष्य केलं. भारत माझाही नाही, नरेंद्र मोदींचा देखील नाही, तो द्रविडी आणि आदिवासी लोकांचा आहे, असं ओवेसी म्हणाले. फक्त मुघल आले असं म्हटलं जातं मात्र, आफ्रिका, इराण, मध्य आशिया आणि पूर्व आशियातून लोक इथं आले आणि या सर्वांचा मिळून भारत बनला. मात्र, आदिवासी आणि द्रविडी लोक इथले आहेत, असं ओवेसी म्हणाले.
ओवेसी यांनी भिवंडी येथील सभेला संबोधित करताना भाजप सरकारवर टीका केली. आज देशात कोणीही महागाई, बेरोजगारीवर भाष्य करत नाही. आज मुस्लीम समुदायाला भाजपची भीती दाखवली जात आहे. भाजप आणि आरएसएसनं देशात असत्य पसरवलं आहे. औरंगजेबानं देशात महागाई वाढवली का असा सवाल ओवेसींनी केला. मुस्लिमांना मारलं जात आहे याला कोण जबाबदार आहे? काश्मीरमध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली त्याला कोण जबाबदार आहे?असा सवाल ओवेसींनी केला.
भारत हा द्रविडीयन आणि आदिवासींचा
असदुद्दीन ओवेसींनी भिवंडीतील सभेत भारत कुणाचा माहिती आहे का, भारत हा उद्धव ठाकरेंचा नाही, ओवेसीचा नाही, ना मोदींचा आणि शाह यांचा आहे, असं म्हटलं. भारत हा द्रविडी आणि आदिवासींचा आहे, असं ओवेसी म्हणाले. भारतात चार ठिकाणाहून लोक आले. मात्र, भाजप आणि आरएसएस हे मुघल आले मुघल आले असं म्हणतात. आफ्रिकेतून लोक आले, इराणमधून लोक आले, मध्य आशिया आणि पूर्व आशियातून लोक आले आणि भारत बनला. मात्र, आदिवासी आणि द्रविडीयन लोक इथले आहेत, असं ओवेसी म्हणाले. आर्य ४ हजार वर्षांपूर्वी इथं आले, असंही त्यांनी म्हटलं.
शरद पवारांना सवाल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील असदुद्दीन ओवेसींनी टीका केली. शरद पवारांनी संजय राऊत यांना वाचवलं आणि नवाब मलिकांना तुरुंगात जाऊ दिलं, असं ओवेसी म्हणाले. शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीत संजय राऊत यांचा उल्लेख केला मात्र नवाब मलिक यांचा उल्लेख केला नाही. संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवाब मलिकांपेक्षा अधिक महत्त्वाचे झाले का?, असा सवाल ओवेसींनी केला. भिवंडीतील एमआयएमचे नेते खालिद गुड्डू आणि नवाब मलिक यांची सुटका करण्यात यावी, असं देखील ओवेसी म्हणाले.