अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा अॅशपाँड फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत शिरले पाणी शिरले
नागपूर | अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा अॅशपाँड फुटल्याने परिसरातील खसाळा, मसाळा, खैरी, कवठा, सुरादेवी या पाच गावांत पाणी शिरले. यात कुठलीही जीवितहाी झाली नाही. जिल्हा प्रशासनाद्वारे त्याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन चमूला पाचारण करण्यात आले. नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आर. विमला यांनी दिले.
मागील काही दिवसांपासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कोराडी औष्णिक विद्युत केंद्रालगत असलेला खसाळा राख बंधारा क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठ्यामुळे फुटला. जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी बंधाऱ्याची व परिसराची पाहणी केली. विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, औष्णिक वीज केंद्राचे मुख्य अभियंता (स्थापत्य) राजेश कराडे, अधीक्षक अभियंता (स्थापत्य) शिरीष वाठ, मुख्य अभियंते अभय हरणे, राजकुमार तासकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते आदी यावेळी उपस्थित होते.
नजीकच्या कळमना गोदनी कामठी या रेल्वे लाईनवरही काही वेळ पाणी साचले होते. एसडीआरएफच्या चमुने रेल्वे लाइन मोकळी करण्यात आली. अनेक ठिकाणी पाणी शिरले मात्र कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. खसाळा राख बंधारा ३४१ हेक्टर क्षेत्रात विस्तारलेला असून सुमारे ७ किलोमीटर जागेत राख साठवण करण्यात येते.
दुपारच्या सुमारास पाण्याचा विसर्ग कमी झाला असून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबविण्यासाठी वीज केंद्राकडून युद्धस्तरीय काम सुरू आहे, अशी माहिती वीज केंद्राव्दारे देण्यात आली आहे.