संत तुकाराम महाराज पालखी आगमनापूर्वी आकुर्डीतील कामे मार्गी लावा; राष्ट्रवादीची मागणी
![Arrange the works in Akurdi before the arrival of Sant Tukaram Maharaj Palkhi; The demand of the NCP](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/संत-तुकाराम-महाराज-पालखी-आगमनापूर्वी-आकुर्डीतील-कामे-मार्गी-लावा-राष्ट्रवादी.jpg)
पिंपरी : श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी २१ जून रोजी आकुर्डी येथे येत आहे. पालखीचा आकुर्डीत मुक्काम असतो. पालखी येण्यापूर्वी प्रभागातील स्थापत्य व आरोग्य विषयक तसेच इतर किरकोळ कामे होणे आवश्यक आहे. परंतु ‘अ‘ क्षेत्रीय कार्यालयाकडे आर्थिक तरतूद नसल्याने कामांना चालना मिळत नाही. त्यासाठी तरतूद करुन आकुर्डीतील कामे मार्गी लावावीत. वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची दशता घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २८ मार्च, ११ एप्रिल, व २५ एप्रिल २०२२ रोजी ‘अ’ क्षेत्रीय कार्यालय मुख्य समन्वयक तथा शहर अभियंता श्रीकांत सवणे यांना पत्र दिले होते. त्याप्रमाणे काही अंशी कामे झाली आहेत. परंतु, स्थापत्य विषयक अद्यापही काही कामे करणे आवश्यक आहे. परंतु, तरतूद नसल्याने कामे पूर्ण झाली नाही. आगामी पालखी सोहळा पाहता पालखीचे पूर्व तयारी म्हणून वारकऱ्यांसाठी निवास, मंडप यासह परिसरातील स्थापत्य विषयक कामांसाठी त्वरित तरतूद मिळणे बाबत विचार व्हावा. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून उर्वरित कामे करून घेता येईल. तसेच, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खालील कामांना गती द्यावी.
पालखी बरोबर येणाऱ्या दिंड्याची निवासी व्यवस्था करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात यावी. पालखी बरोबर येणारे वारकरी व भक्तांसाठी ‘फिरते शौचालय’ विविध ठिकाणी उभी करण्यात यावे. भटक्या श्वानांचा बंदोबस्त व रस्त्यावरील खड्डे बुजविणे. प्रभाग क्र.२१ ची संपूर्ण स्वच्छता तसेच जागोजागी पावडर व औषध फवारणी करावी.
सायंकाळचा पाणी पुरवठा सुरु ठेवणे. विद्युत पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता घेण्याबाबत विद्युत विभाग सतर्क ठेवणे. तसेच, महावितरण विभागाशी संपर्क साधणे. सर्व सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करण्यासाठी चोवीस तास सोय करणे. पालखी नंतर २३ जून २०२२ रोजी संपूर्ण प्रभाग स्वच्छ करण्याबाबत आरोग्य विभागाला सूचित करावे. कोरोना महामारीच्या संकटानंतर सुमारे दोन वर्षानंतर मोठ्या प्रमाणात सोहळा होण्याची शक्यता ग्राह्य धरून सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.