‘राम नवमी मिरवणुका आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी द्या’ : आमदार आशिष शेलार
!['Allow Ram Navami procession and Gudipadva processions': MLA Ashish Shelar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/Ramnavami-Gudhipadawa-muambai.jpg)
मुंबई : राम नवमीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुका आणि गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजप आमदार ॲड् आशिष शेलार यांनी आज, गुरुवारी विधानसभेत केली.
राज्यावर करोनाचं संकट कोसळल्यानंतर राज्य सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक निर्बंध लागू केले. करोना रुग्णांची संख्या जसजशी कमी होऊ लागली, तसे राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. जानेवारी २०२२ पासून राज्यातील करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. मार्चमध्ये तर राज्यातील दैनंदिन करोना रुग्णांची संख्या शंभराच्या खालीही आली आहे. तर मृत्यूचा आकडाही मार्चमध्ये आतापर्यंत पाच ते सहा वेळा शून्यावर आला आहे. त्यामुळे करोना पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही निर्बंध शिथिल केले आहेत. सर्व व्यवहार आता पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होऊ लागले आहेत. त्यामुळे आगामी काळात येणारे सण-उत्सवही मोठ्या उत्साहात साजरे व्हावेत, असे अनेकांना वाटते. येत्या काही दिवसांत राम नवमी आणि गुढीपाडवा हे सण आणि उत्सव साजरे होणार आहेत. त्यानिमित्त मिरवणुका आणि शोभायात्रा काढण्यात येतील. त्यांना राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
राज्यातील कोराना स्थिती आटोक्यात आल्यानंतर विविध सण, उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. त्यामुळे आता राम नवमी १० एप्रिलला साजरी होणार असून, राम नवमीच्या निमित्ताने राज्यात मिरवणुका काढल्या जातात. तसेच २ एप्रिलला गुढीपाडवा असून मराठी नववर्षानिमित्ताने मोठया प्रमाणात शोभायात्रांचे आयोजन करण्यात येते. या मिरवणुकांना व शोभायात्रांना सरकारने परवनगी द्यावी, याबाबत निवेदन करावे अशी मागणी आमदार ॲड् आशिष शेलार यांनी केली. त्याची दखल घेऊन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत उद्या निवेदन करण्यात येईल, असे सांगितले.