ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय आल्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज ओबीसी आरक्षण सोडत जाहीर
![After the decision to give political reservation to OBCs, it was announced today that OBC reservation will be waived for the upcoming elections of Ambernath Municipality](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/After-the-decision-to-give-political-reservation-to-OBCs-it-was-announced-today-that-OBC-reservation-will-be-waived-for-the-upcoming-elections-of-Ambernath-Municipality.jpg)
अंबरनाथ: ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा निर्णय आल्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आज ओबीसी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये ५९ प्रभागांपैकी १४ प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले. अंबरनाथ नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका मार्च २०२० मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र, कोरोनामुळे गेल्या २ वर्षांपासून निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयानं प्रलंबित निवडणुका तातडीनं घेण्याचे आदेश दिल्यानंतर १३ जून २०२२ रोजी अंबरनाथ पालिकेनं अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण सोडत काढली होती. ज्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ८, तर अनुसूचित जमातींसाठी २ जागा आरक्षित झाल्या होत्या. त्यावेळी ओबीसी आरक्षण नसल्यानं उर्वरित सर्व ४९ जागा या खुल्या प्रवर्गासाठी शिल्लक राहिल्या होत्या.
मात्र, ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर ५९ पैकी १४ जागांवर ओबीसी आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामुळे आधीच्या अनुसूचित जाती जमातींच्या राखीव जागा वगळून उर्वरित ४९ पैकी १४ जागा लॉटरी पद्धतीने ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आल्या. त्यापैकी ७ जागा या ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असतील. तर उर्वरित ३५ जागा या खुल्या प्रवर्गासाठी असून त्यापैकी १८ जागा महिलांसाठी आरक्षित असतील.
आज ठाण्याचे भूमापन उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांच्या उपस्थितीत अंबरनाथ नगरपालिका सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रशांत शेळके हे देखील उपस्थित होते. तर अंबरनाथ शहरातील इच्छुक उमेदवारही यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सर्वसाधारण प्रवर्गातील १८ जागा या महिलांसाठी यापूर्वीच आरक्षित करण्यात आल्या असून त्यामुळे आता अंबरनाथ पालिकेतील आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या आरक्षण सोडतीवर काही हरकती असल्यास त्या १ ऑगस्टपर्यंत नोंदवता येणार आहेत. या सगळ्यानंतर अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक आता कधी जाहीर होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.