गजानन टॉकीजजवळ दोन गटात जीवघेणी हाणामारी झाली असल्याची धक्कादायक घटना समोर
![A shocking incident has come to light that there was a fatal clash between two groups near Gajanan Talkies](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/A-shocking-incident-has-come-to-light-that-there-was-a-fatal-clash-between-two-groups-near-Gajanan-Talkies.png)
बुलडाणा : शहरात वाढत्या अवैध धंद्यामुळे दादागिरीचा जोर वाढला असून येथील गजानन टॉकीजजवळ दोन गटात जीवघेणी हाणामारी झाली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कुख्यात गुंड समाधान मोरे आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या चाकू हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात पिता पुत्राचा समावेश आहे. तर हल्लेखोर फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान गजानन टॉकीजजवळ विशाल पान सेंटरच्या बाजूला महावीर किराणा दुकान आहे. दुकानमालक अग्रवाल आणि समाधान मोरे याचे नातेवाईक बबन यांच्यात पैशाच्या व्यवहारातून वादविवाद झाले. यात अग्रवाल यांच्याकडून संतोष पाटील (रा. जुनागाव) हे मध्ये पडले. परंतु समाधान मोरे, त्याचा भाचा रितेश आणि इतर दोन-तिन जणांनी संतोष पाटील यांना मारहाण केली. हे कळल्यानंतर पाटील यांचा तरुण मुलगा तुषार आपला मित्र सनी पवार याला घेऊन महावीर किराणावर पोहोचले. त्याठिकाणी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.
सनी पवार (कैकाडीपुरा) याचे वडील संजू पवार तिथेच होते. ते सुद्धा आपल्या मुलाला वाचविण्यासाठी मध्ये पडले. दरम्यान, समाधान मोरे व त्याचा भाचा रितेश यांच्यापैकी कुणाकडे चाकू होता, की दोघांकडे होता याची निश्चित माहिती नाही. परंतु त्यांच्या चाकू हल्ल्यात संतोष संतोष पाटील, सनी संजू पवार आणि सनीचे वडील संजू तिघेही गंभीर जखमी झाले आहेत. तुषार याच्या पोटात चाकू खुपसण्यात आला. त्याचे लिव्हरला इजा पोहोचली असल्याची माहिती आहे. तर संजू पवार यांच्या किडनीपर्यंत चाकू आत गेला असून तो देखील गंभीर जखमी झाला आहे. सनीवर देखील जीवघेणा हल्ला झाल्याने त्याची देखील मांडी फाटली.
तिघांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. सनीच्या मांडीवर वार असल्यामुळे त्याला येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर तुषारच्या पोटातून भयंकर रक्तस्त्राव होत होता आणि संजू पवार यांच्या पोटातही चाकू लागल्यामुळे या दोघांना तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार संजय गायकवाड, त्यांचे पुत्र मृत्युंजय यांनी हॉस्पिटल गाठून जखमींची भेट घेतली. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील अॅंम्ब्युलन्समधून गंभीर जखमीना औरंगाबादला नेण्यात आले. दवाखान्यात शेकडो लोक जमा झाले होते. हल्ल्यानंतर समाधान मोरे आणि त्याचे साथीदार फरार झाले आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. तर शहरात दहशतीचे वातावरण आहे.