सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं? भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोव्हिडमुळे झालेले नुकसान लक्षात घेता मद्यविक्री परवान्यात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मंदिराच्या आधी बार उघडले आणि आता दारु परवान्यांवर थेट ५० टक्के सूट देण्यात आलीय. हे सरकार दारुवाल्यांवर इतकं मेहरबान का आहे? की दारुवाले सरकारमधील काही मंत्र्यांवर मेहरबान आहेत का?, असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
रेस्तराँ आणि बारचालकांना मोठा दिलासा देत परवाना शुल्कात राज्य सरकारने 50 टक्क्यांची कपात केल्यानंतर चित्रा वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.
सर्वसामान्य नागरिक हा रस्त्यावर उतरला. वीजबिलामध्ये सवलत द्या अशी मागणी केली. सरकारने सवलत दिली नाही. घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल कशामध्येच सर्वसामान्यांना दिलासा मिळाला नाही. हे सरकार गोरगरिबांच आहे की दारुवाल्यांचं?, दारुवाल्यांची सेवा हाच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम आहे का?, असा सवाल देखील त्यांनी केला.