शिवसेनेचं हिंदुत्व भेसळयुक्त झालंय; सरकारवर टीका करताना आशिष शेलार म्हणाले…
![BJP Ashish Shelar criticises Shivsena over Gujrati Rally says...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/ashish-shelar-udhav-thakare-Frame-copy.jpg)
शिवसेनेच्या गुजराती मेळावा, विरोधी पक्षनेत्यांच्य सुरक्षेत केलेली कपात यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. “मालवणी खाजो पण आमचो आणि गुजराती फापडो पण आमचो. शिवसेनेने घेतलेल्या गुजराती मेळावा हा स्वतःचा तोटा भरून काढण्यासाठी केलेला प्रयत्न असून शिवसेनेचं भेसळयुक्त हिंदुत्व झालंय. त्यातून त्यांचं व्होट बॅक घसरली आहे. त्यामुळे शिवसेना शेवटच्या क्षणाला केलेला हा डिस्प्रेट प्रयत्न आहे.”, अशी टीका त्यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यावेळी बोलताना केली आहे. तसेच “शिवसेनेने केलेल्या गेल्या पाच वर्षांतील अविकसित कामगिरीवर मुंबईकर जनता नाराज आहे. त्यामुळे त्यांना सर्व मुंबईकर धडा शिकवतील.”, असेही शेलार म्हणाले.
राज्यात भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांसारख्या बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरुनही शेलार यांनी टीका केली. आशिष शेलार म्हणाले की, “पोलिसांनी जनतेची सुरक्षा करावी हे अपेक्षित आहे. याच भूमिकेतून जर राज्य सरकारचा निर्णय असेल तर त्यावर टीका उगाच करावी, अशी आमची इच्छा नाही. मात्र ज्या पद्धतीने त्या यादीमधे भाजपच्या आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांची सुरक्षा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्याचं वर्णन करायचं तर असुरक्षित मनोवृत्तीच्या सरकारने घेतलेला हा निर्णय आहे. या सरकारची मनोवृत्तीच असुरक्षित आहे.” असा टोला त्यांनी लगावला. “हे सरकार असुरक्षित मनोवृत्तीत काम करतंय. त्यामुळे अजून एक चुकीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय कोणत्याही वैज्ञानिक किंवा अभ्यासाच्या दृष्टीकोणातून न घेता राजकीय दृष्टीकोणातून घेण्यात आला आहे.”, असंही ते पुढे बोलताना म्हणाले.