राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी ‘महाराष्ट्र रक्षक’ सज्ज
महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातील मोठे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर मनसेने राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र रक्षक पथक बनवलं आहे.
राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत राज यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून त्यांना वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली गेली. या निर्णयामुळे आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता मनसेचे सरचीटणीस नयन कदम यांनी राज यांच्या संरक्षणासाठी खास ‘महाराष्ट्र रक्षक’ नावाची टीम तयार केली आहे.
आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या बैठकीत राज ठाकरे यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील.