मी लढणारा अन् शत्रू अंगावरती घेणारा आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुंबई |महाईन्यूज|
आयुष्यात पहिल्यांदाच सभागृहात आलो, सभागृहात आलो हे माझं भाग्यच आहे. सभागृहात येण्याचं दडपण होतं, मला सभागृहात कसं होईल याची चिंता होती, पण इथं आल्यावर कळलं मैदानातच चांगलं असतं. मोकळ्या मैदानात मी तलवारबाजी करणार नाही. मी समोरासमोर लढणारा आहे. शत्रूला अंगावरती घेणारा आहे. आता कोणी शत्रू नाही, तर राजकीय विरोधक आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. विधानसभेच्या सभागृहात बहुमत सिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.
देशात अनेक राज्य आहेत, त्यात आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे. आता संपूर्ण देशही आपलाच आहे. हे दैवत ज्या मातीत जन्माला आलं, त्या मातीत जन्माला आलेल्या शिवरायांचे आम्ही भक्त आहोत. मी छत्रपती महाराजांची शपथ घेतली, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, हा जर गुन्हा असेल, तर तो एकदा नाही तर प्रत्येक जन्मात तो मी करेन, जो आईवडिलांना मानत नाही, तो पुत्र म्हणून जगायच्या लायकीचा नाही. विरोधकांशी सामना करणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला साधू, संत आणि समाजसुधारकांचा महाराष्ट्र अपेक्षित असल्याचंही ते म्हणाले आहेत.
माझ्या मंत्रिमंडळावर या सभागृहानं जो विश्वास व्यक्त केलेला आहे, त्याबद्दल मी आपल्यामार्फत सर्वच सन्माननीय सदस्यांचे आभार व्यक्त करतो. मी तमाम मायबाप जनतेचे सुद्धा आभार मानतो आहे. त्यांच्या आशीर्वादाशिवाय हा कारभार करता येणं शक्य नसल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.