महाराष्ट्रातील खासगी साखर कारखान्यांच्या चौकशीचे आदेश
![Private Sugar Factory in western maharashtra is under probe](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Private-Sugar-Factory-in-western-maharashtra-is-under-probe.jpg)
मुंबईः पश्चिम महाराष्ट्र साखर उत्पादनाचे केंद्र समजला जातो. या भागात खासगी गुंतवणूक तत्त्वावर अनेक साखर कारखाने सुरू केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील हेच साखर कारखाने कंपनी कामकाज मंत्रालयाच्या सखोल चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. कंपनी कामकाज मंत्रालयातर्फे या कारखान्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती.
यानंतर कंपनी कामकाज मंत्रालयाने पुणे कंपनी निबंधक कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना या कारखान्यांच्या सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार चौकशीमध्ये हजारो कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. कंपनी कायद्याच्या नियमांचा भंग करत या खासगी साखर कारखान्यांनी भाग विक्री (शेअर्स) करून आर्थिक घोटाळे केल्याचे प्राथमिक अहवालात दिसून आले आहे.
अवश्य वाचाः Corona Vaccine; करोनाची लस घेतल्यानंतर दोन महिने मद्यप्राशन बंद ठेवण्याच्या सूचना
कंपनी कायदा १९५६ अनुसार खासगी कारखान्यांना एका आर्थिक वर्षांत ४९ भागांची तर नवीन २०१३ च्या कंपनी कायद्यानुसार एका आर्थिक वर्षांत जास्तीत जास्त २०० भागांची विक्री करता येते. मात्र या कारखान्यांच्या अध्यक्ष आणि संचालकांनी या कायद्याचा भंग करून प्रतिवर्षी २०० पेक्षा जास्त भागधारक घेतल्याची माहिती कारखान्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उघड झाली.
पुणे कंपनी निबंधक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात पश्चिम महाराष्ट्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे येतात.