…मग काय यांची दादागिरी चालणार का? कोण संजय राऊत? वाचा काय म्हणाले चंद्रकांत पाटील
![Chandrakant Patil criticise Sanjay Raut on metro car shed](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/Sanjay-Raut-Chandrakant-Patil.jpg)
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र कांजरूमार्ग येथील कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सरकारला मोठा धक्का बसला आहे. यानंतर आता भाजप आणि शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
कांजूरमार्गच्या जागेवर कुणी राजकारणी बंगले किंवा फार्महाऊस बांधणार नाहीत. हा मुंबई, महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाच्या विकासाचा विषय आहे. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दुर्दैवी, असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न केला असता त्यांनी, कोण संजय राऊत ? असा प्रश्न करत खिल्ली उडवली आहे. ते शिर्डी दौऱ्यावर असताना बोलत होते.
न्यायालयाने निर्णय द्यायचा नाही मग काय यांची दादागिरी चालणार का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. पाटील म्हणाले की, घटनेच्या चौकटीतील गोष्टी मानाव्या लागतील. एखाद्या घटनेसंदर्भात न्यायालयात जायचे नाही का?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला. यांना निवडणूक आयोग आणि कोर्टाचे निर्णय मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार उत्तम सुरू आहे आणि पुढेही सुरू राहील. हे सर्व तुम्हाला मान्य नाही का?
तसेच, तीन पक्ष एकत्र आले असल्याने महाविकास आघाडीला निवडणुकीत फायदा होत असल्याचे देखील त्यांनी मान्य केले. सोबतच आम्हीसुद्धा ग्रामपंचायतच्या निवडणुका ताकदीने लढवणार असल्याचाही निर्धारही चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवला.