… तर खासदार बारणे राजकारणातून हद्दपार होतील – दत्ता सानेंचा विश्वास
- मावळ, शिरुर आणि बारामती मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील
- नरेंद्र मोदींची लाट नव्हतीच, जनतेने निवडून हातात घेतल्याने धक्कादायक निकाल
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरुर आणि बारामती या तिन्ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेस महाआघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी निवडून येतील, त्यामुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीतील नरेंद्र मोदीची लाट यंदाच्या 2019 मधील निवडणुकीत पुर्णपणे ओसरली होती. यावेळेस जनतेने ही निवडणुक हातात घेतल्याने मावळ, शिरुर या दोन्ही जागेवर धक्कातंत्राचे निकाल लागून महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेच्या विद्यमान दोन्ही खासदारांना पराभवास सामोरे जावे लागेल. त्यामुळे 23 मे च्या लोकसभा निवडणुक निकालानंतर खासदार श्रीरंग बारणे हे राजकारणातून हद्दपार होतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचा निश्चित पराभव होईल, त्यामुळे अजित पवारांनी राजकारणातून संन्यास घ्यावा, असे उद्गगार काढले होते. त्यावर विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी खासदार बारणे यांना प्रतिउत्तर दिले आहे.
साने म्हणाले की, शिरुरमध्ये शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील हे गेल्या पंधरा वर्षापासून खासदार आहेत. तर मावळ लोकसभेवर श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व असूनही त्यांना विकास करता आलेला नाही. मागील निवडणुकीत नरेंद्र मोदीच्या लाटेवर स्वार होवून शिवसेनेचे खासदार मोठ्या फरकाने विजय झाले. परंतू, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीची लाट पुर्णपणे ओसरल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षात नरेंद्र मोदींनी जनतेला दिलेले एक आश्वासन पुर्ण न केल्याने ही निवडणुक जनतेने हातात घेतली होती.
देशात व राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता असूनही बेरोजगारी, शेतक-यांच्या मालाला हमी भाव, मराठा, मुस्लीम, धनगर समाजाचे आरक्षण, पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न, रेडझोन यासह अनेक प्रश्न सध्यस्थितीत प्रलंबित आहेत. त्यामुळे सर्व समाज घटकांतून महायुतीच्या विरोधात नाराजीचा सुर दिसून आला. त्या नाराजीचे रुपातंर महाआघाडीने मतांमध्ये रुपांतर केलेले आहे. त्यामुळे बारामतीसह मावळ, शिरुर लोकसभेवर महाआघाडीचा विजय होणार आहे.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना खासदारांनी स्वताः केलेल्या विकास कामापेंक्षा वैयक्तीक पातळीवर जावून विरोधी उमेदवाराचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. तसेच विकास कामांवर बोलण्यापेक्षा केवळ आरोप करण्यातच धन्यता मानली. स्वताः खासदार बारणेंच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे आणि पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांनी पातळीसोडून टिका-टिप्पणी करायला लागले. हे मावळातील जनतेला अजिबात रुचलेले नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार बारणे हे राजकारणांतून हद्दपार होतील, असा विश्वास साने यांनी व्यक्त केला आहे.