“जरी माझी सुरक्षा काढली तरीही ‘हेच’ माझं सुरक्षा कवच”; मुनगंटीवार यांची टीका
राजकीय आकसापोटी जरी माझी सुरक्षा काढली असली तरी आमचे कार्यकर्ते आणि जनतेचा आशिर्वाद हेच माझं सुरक्षा कवच आहे, अशी उपरोधिक टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपकडून टीका केली जात आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “महविकासआघाडीतील काही लोकांच्या पोटात दुखत होत की आम्ही विरोधी पक्षात असून आम्हाला सुरक्षा कशी त्यामुळे माझी सुरक्षा काढली. नक्षलग्रस्त जिल्हात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही त्याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नाही. आमचे कार्यकर्ते आणि जनतेचा आशिर्वाद हेच आमचं सुरक्षा कवच म्हणून कार्य करणार आहेत”