केंद्रीय कृषीमंत्र्यांचे शेतकऱ्यांना पत्राद्वारे आवाहन, MSP बाबत लिखित आश्वासन देण्यास तयार
नवीन कृषी कायद्याविरोधात 22 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारशी अनेक चर्चा करूनही कोणताही तोडगा निघालेला नाही. शेतकरी कायदा रद्द करण्याच्या मागणीवरून ठाम आहेत. सरकारकडून शेतकऱ्यांनी आंदोलन लवकरात लवकर मागे घ्यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना 8 पानी पत्र लिहित, कृषी कायदा कशाप्रकारे चांगला आहे, याची माहिती दिली आहे. सोबतच सरकार एमएसपीबाबत लिखित स्वरूपात आश्वासन देण्यास तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
तोमर पत्रात म्हणाले की, सरकारने गेल्या ६ वर्षांमध्ये एमएसपीद्वारे जवळजळ दुप्पट रक्कम शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचविली. एमएसपी सुरू आहे आणि सुरू राहील. शेतकऱ्यांची जमीन हिरावून घेतली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तोमर यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, एमएसपीबाबत सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार आहे. एमपीएमसीच्या बाहेर खासगी बाजारात राज्यांना कर लावण्याची परवानगी देता येईल. राज्यांना कृषी करार नोंदणी करण्याचा अधिकार असेल. कोणत्याही प्रकारच्या वादात शेतकऱ्यांकडे न्यायालयात जाण्याचा देखील पर्याय असेल. तसेच, शेतकऱ्यांच्या जमिनीवर कोणीही ताबा मिळवू शकत नाही.