काँग्रेसने मोदींविरुद्ध केलेल्या तक्रारींवर ६ मेपर्यंत निर्णय द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश
नवी दिल्ली | काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारींवर येत्या सोमवारपर्यंत (६ मे) निर्णय द्यावा, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर आचारसंहिता भंगचा आरोप करत तब्बल ११ तक्रारी दाखल केल्या आहेत. या ११ तक्रारींपैकी ३ तक्रारींचा निकाल निवडणूक आयोगाने दिला असून उर्वरित तक्रारींवर येत्या सोमवारपर्यंत निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
पंतप्रधान मोदींविरोधातील तक्रारींवर निर्णय घेण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर गुरुवारी (२ मे) झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायलयाने निवडणूक आयोगाला याप्रकरणी ६ मेपर्यंत तकारींवर निर्णय देण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. काँग्रेसने पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या ११ तक्रारींपैकी ३ प्रकरणी निवडणूक आयोगाकडून मोदींना क्लीन चीट देण्यात आली आहे.