“उद्धवजी लक्ष देत नसतील तर राऊतांनी राहुल गांधींना सल्ले द्यावे”, ‘या’ भाजप नेत्याची टीका
भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूवरून होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोप यावरून शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
“उद्धवजी अगदीच लक्ष देत नसतील तर संजय राऊतांनीराहुल गांधींना सल्ले द्यावेत. मोदीद्वेषाचा कॉमन फॅक्टर आहेच. शिवाय दोघांचे विचार आणि वैचारिक उंची सारखी आहे,” असं म्हणत भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांवर निशाणा साधला. “इतिहास साक्षी आहे ज्या पत्रकारांनी वैयक्तिक आकस आणि द्वेषातून मोदींचा विरोध केला, जनतेने त्यांचा बाजार उठवला. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, जनता जनार्दनाची सेवा करून तिसाऱ्यांदाही होतील,” असं भातखळकर म्हणाले.
काय होतं सामना अग्रलेखात
भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूचे खापर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. चिमुकल्यांची होरपळ आणि कुपोषणाची पानगळ महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, अशी टीका सामनातून करण्यात आली होती.