‘भाजपचे हिंदुत्व एक दिवस तुम्हा-आम्हाला वल्कले गुंडाळून फिरायला लावेल’; ठाकरे गटाचा टोला
![Uddhav Thackeray said that one day BJP's Hindutva will make you and us walk around in a blanket.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Uddhav-Thackeray-and-Narendra-Modi-780x470.jpg)
मुंबई : द्रमुक पक्षाचे खासदार सेंथिलकुमार यांनी संसदेत भाजपच्या तकलादू हिंदुत्वावर टीका केल्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. भाजपाला फक्त हिंदी भाषिक पट्ट्यातच यश मिळतं. आम्ही त्यांना गोमूत्र राज्य म्हणतो, असं सेंथिलकुमार म्हणाले. त्यांच्या या विधानावरून सत्ताधारी भाजपानं मोठा गदारोळ केला.यावरून शिवसेना ठाकरे गटानं भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. याबाबत सामनामधील अग्रलेखातून ठाकरे गटानं आपली भूमिका मांडली आहे.
सामनाच्या अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
सध्याचा भाजप देशाबरोबर हिंदुत्वाला सोवळ्यात व शेंडी-जानव्याच्या गाठीत अडकवून ठेवू इच्छित आहे. द्रमुक पक्षाच्या खासदाराने गोमूत्रबाजीवर हल्ला केला, पण भाजपचे हे हिंदुत्व म्हणजे संपूर्ण देशाचे हिंदुत्व नाही. हिंदू म्हणून अभिमान बाळगणारा मोठा वर्ग आधुनिकतेची कास धरतो व त्यांना भाजपच्या शेंडी-जानव्याच्या गाठी मान्य नाहीत. निवडणुका आल्या की, मोदी कपाळास चंदन आणि भस्म लावून सोवळे-पितांबरात एखाद्या मंदिरात जातात व त्याची प्रसिद्धी करतात. हे आता नित्याचेच खेळ झाले. गंगाकिनारी अस्पृश्यांचे पाय धुण्याचे सोहळे पार पाडतात, पण त्याच वेळी कश्मीरमधील आक्रोश करणारा हिंदू पंडित, त्यांचे निर्वासित जीवन त्यांना अस्वस्थ करीत नाही.
हेही वाचा – उद्धव ठाकरे ‘इंडिया’चा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार? संजय राऊत म्हणाले..
प्राण जाय पर वचन न जाय’ हाच खऱ्या हिंदुत्वाचा मंत्र आहे, पण गेल्या आठ वर्षांत किती वचनांची पूर्तता झाली? महागाईपासून बेरोजगारीपर्यंत परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे कोट्यवधी हिंदू बेरोजगार आहेत व मोफत रेशन (५ किलो) देऊन भिकारी बनवणे हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. हे कोणत्या प्रकारातले हिंदुत्व मानायचे? प्रश्न इतकाच आहे, भाजपसाठी हिंदुत्व हा राजकीय खेळ आहे व या खेळास हिंदी भाषिक पट्टय़ात थोडी बरकत आली आहे.
हिंदू धर्मास भाजपा असे कफल्लक करून ठेवतील की एक दिवस ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे अभिमानाने बोलण्याची लाज वाटू लागेल. कोणी काय खावे, कोणते कपडे घालावेत हे सगळे हेच ठरविणार. निवडणुकांमध्ये हिजाब वगैरे विषय पेटवायचे आणि त्यावर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या. राजस्थानात आता भाजपची सत्ता येताच त्या पक्षाच्या एका आमदाराने जयपूरमध्ये रस्त्यावर उघडपणे फिरत मांसाहारी हॉटेल आणि मांसविक्रीची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. असे हिंदुत्व काय कामाचे? असा सवालही ठाकरे गटानं उपस्थित केला आहे. भाजपचे हिंदुत्व मात्र एक दिवस तुम्हा-आम्हाला वल्कले गुंडाळून फिरायला लावेल, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.